पोस्ट कार्यालयाचा गलथान कारभार
By Admin | Updated: May 21, 2014 04:48 IST2014-05-21T04:48:03+5:302014-05-21T04:48:03+5:30
शहरातील पहिले पोस्ट कार्यालय असलेल्या ब्राह्मण आळीतील टपाल कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टमास्तर नाही.

पोस्ट कार्यालयाचा गलथान कारभार
भिवंडी : शहरातील पहिले पोस्ट कार्यालय असलेल्या ब्राह्मण आळीतील टपाल कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून पोस्टमास्तर नाही. एकंदरच गलथान कारभार सुरू असून पत्रांसह इतर सामान वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ब्राह्मणआळीतील पोस्ट कार्यालय १८९३ साली स्थापन झाले. शहरातील तत्कालीन हातमाग व यंत्रमाग कामगारांना पत्र व पैसे गावी पाठवण्याचे प्रमुख माध्यम म्हणून कार्यरत होते. मोबाइलने गावाची खुशाली कळू लागली. बँकेद्वारे पैसे ट्रान्सफर होऊ लागले, तरीदेखील केंद्रीय डाक विभागाने आधुनिकता आणली. घरोघरी पोस्टाचे सामान पोहोचवणार्या पोस्टमनच्या सर्व्हिसप्रमाणे त्यांचे वेतनही शासकीय नियमानुसार वाढले. तरीदेखील शहरातील अनेक नागरिकांना पोस्टमनने आधारकार्ड स्वत: न देता अनोळखी मुलाकडून पाठवून पैशांची मागणी केल्याचे आरोपही झाले. तसेच या कार्यालयात ट्रॅव्हल एजन्सीशी संगनमत करून नागरिकांना रेल्वे तिकीटसेवा न पुरवणार्या पोस्टमास्तरला गेल्या वर्षी पकडून दिले. मात्र, गलथान कारभारात आजही सुधारणा झालेली दिसून येत नाही. अनेकांचे टपाल व वृत्तपत्रीय टपाल नियमित घरोघरी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कार्यालयातील पोस्टमास्तर एस.ए. सोनावणे ३० मार्च २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पोस्टमास्तर नसल्याने पोस्टमनवर कोणाचाही दबाव नसल्याचे कार्यालयीन सूत्राकडून समजले. या सर्व प्रकाराची चौकशी करून ठाणे पोस्ट कार्यालयाने ही जागा त्वरित भरून काढून नागरिकांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. (प्रतिनिधी)