जिकडे तिकडे प्लास्टिक; नदी, नाल्यातही प्लास्टिक; नालेसफाई वर्षातून एकदा नव्हे, नियमित करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:35 IST2025-06-05T13:32:43+5:302025-06-05T13:35:02+5:30
‘प्लास्टिकच्या वापरापेक्षा उत्पादनावर बंदी घाला’

जिकडे तिकडे प्लास्टिक; नदी, नाल्यातही प्लास्टिक; नालेसफाई वर्षातून एकदा नव्हे, नियमित करा!
खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्लास्टिकच्या अति वापरामुळे मुंबईतील नदी, नाले तुंबले असून पुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्याची, बंद करण्याची आणि नदी-नाल्यांमधून वर्षातून केवळ एकदा गाळ काढण्याऐवजी नियमितपणे गाळ उपसा करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक गोपाळ झव्हेरी यांनी व्यक्त केले. असेच राहिले तर, आणखी विदारक स्थिती होईल.
मुंबईतील नालेसफाईला सुरुवात केली जाते आणि महिन्याभरात हे काम उरकण्याकडे प्रशासनाचा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या माध्यमातून प्लास्टिक समुद्रात जात राहते. प्रत्यक्षात, नालेसफाई डिसेंबरमध्ये सुरू करून मे महिन्यापर्यंत ते काम पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, नालेसफाई पूर्ण होत नसल्याने प्लास्टिकचा कचरा थेट समुद्रात जातो व प्रदूषणात वाढ होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईत कर्करुग्णांचे प्रमाण वाढण्यामागे प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हे एक प्रमुख कारण आहे असे झव्हेरी म्हणाले.
‘प्लास्टिकच्या वापरापेक्षा उत्पादनावर बंदी घाला’
पर्यावरण दिवस साजरा करताना मुंबईकरांना मुळात स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण मिळत आहे का, हे पाहण्याची गरज आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावरील बंदी कागदावरच आहे.
बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू मिळतात. प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला आहे. खरे म्हणजे प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यापेक्षा सरकारने त्याच्या उत्पादनावरच बंदी घालण्याची गरज आहे, असे मत झव्हेरी यांनी व्यक्त केले.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. मुंबईतील नदी-नाल्यांमध्ये प्लास्टिक फेकले जाते. तेथून ते समुद्रात जाते आणि भरतीच्या वेळी समुद्र पुन्हा ते किनाऱ्यावर आणून सोडतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करणे हाच पर्याय आहे.
गोपाळ झव्हेरी, पर्यावरण अभ्यासक