Mumbai Local Accident: मुंब्रा रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाण्यातील मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान झालेल्या लोकल ट्रेन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी घाटकोपरमध्ये रेल्वे फलाटाच्या फटीत अडकून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे फलाटाच्या फटीत अडकलेल्या प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले. त्यामुळे आता पुन्हा लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
शुक्रवारी मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून उतरताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ८:०२ वाजता मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून तो उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि रेल्वे फलाटाच्या फटीत पडला. प्रवाशाला उपचारासाठी तात्काळ मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत लोकल अपघाताच्या बातम्या समोर येत असतानाच पाच दिवसांपूर्वी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली होती. दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान दोन लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात सहा जण जखमीही झाले. सकाळी ८:०० ते ९:३० च्या दरम्यान दोन लोकल ट्रेन एकमेकांना समांतर जात असताना ही घटना घडली. गर्दीमुळे आणि कदाचित ट्रॅकवर तीव्र वळण आल्यामुळे फूटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांचा तोल गेला आणि ते रेल्वे ट्रॅकवर पडले. मृतांमध्ये एका जीआरपी कॉन्स्टेबलचाही समावेश होता.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोक दरवाज्याला लटकवून प्रवास करत होते. अपघातानंतर रेल्वे सुरक्षा दल, पोलिस आणि स्थानिक लोकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेने सर्व नवीन आणि विद्यमान लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला.