अपघातात जखमी झालेल्या पंडोल दांपत्याला मुंबईत हलवलं, २० डॉक्टरांची टीम करतेय उपचार
By संतोष आंधळे | Updated: September 5, 2022 18:19 IST2022-09-05T18:18:30+5:302022-09-05T18:19:40+5:30
या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं झालं होतं निधन.

अपघातात जखमी झालेल्या पंडोल दांपत्याला मुंबईत हलवलं, २० डॉक्टरांची टीम करतेय उपचार
रविवारी दुपारी मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील कसाजवळील चारोटी टोलनाक्याजवळ अपघात झाल्यानंतर जखमी डॉ अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती दरायुस पंडोल यांना तात्काळ उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना सोमवारी सकाळी गिरगाव येथील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविण्यात आले असून २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याचे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या अपघाताची घटना घडल्यानंतर सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या १० डॉक्टरांचे पथक वापी येथील रुग्णालयात संध्याकाळीच पोहचले होते. त्यांना मुंबईच्या रुग्णलयात हलविण्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून ठेवण्यात आली होती. मात्र उपस्थित डॉक्टरांनी दोन्ही रुग्णांना रस्त्यामार्गे ऍम्ब्युलन्सने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी पहाटे त्यांना या गिरगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विविध विषयातील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयाच्या वतीने त्यांच्या उपचाराकरिता शक्यतो सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात अशा आमच्या सदिच्छा असल्याचे रुग्णलयाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ तरंग ग्यानचंदानी यांनी सांगितले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.