Join us  

Pandharpur Election Results : टप्प्यातची भाषा करणारे... पंढरपूर विजयानंतर भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 3:18 PM

समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला

ठळक मुद्देसमाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला

मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत, तरीही भाजपा समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. भाजपानेही विजय निश्चित मानला असून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. 

समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं. अद्याप अधिकृत विजयाची घोषणा झाली नसली, तरी भाजपा नेते आणि समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.  भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. ''महाविकास आघाडीची पूर्ण ताकद, अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आलं की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे  नाना पटोले यांची सभा, प्रशासनाचा फौजफाटा, साम-दाम-दंड-भेद, सगंळ करुनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच,'' असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केलंय. पंढरपुरातील विजयानंतर भाजपाकडून ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. 

अजित पवारांचा होता मुक्काम

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण, तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. मात्र, तरीही राष्ट्रवादीला ही जागा राखता आली नाही. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघात मुक्काम ठोकला होता. गावोगावी जाऊन प्रचाराची रणनिती आखली होती. मात्र, तरीही भाजपाने ही जागा राष्ट्रवादीच्या तावडीतून आपल्याकडे खेचून आणली आहे. 

पळडकर म्हणतात परिचारकांनी पंढरपूर सांभाळलं

पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमदेवाराला 10-10 हजारांचं मताधिक्य मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसला होता. पण, यंदा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरात चांगली मोट बांधली आहे. येथील मतदारसंघातून दोनवेळा परिचारक यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, जवळ राहून अंतर्गत विरोध करणाऱ्यांना यंदा प्रशांत परिचारक यांनी बाजूला सारले. तसेच, या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ घेऊन मतदारसंघात भाजपाचा प्रचार केला. त्यामुळे, राष्ट्रवादीला अपेक्षित मतं येथून मिळाली नाहीत. अठराव्या फेरीअखेरची आकडेवाडी सांगताना, आता मंगळवेढा शहर आणि ग्रामीणची मतमोजणी होणार आहे. सध्या समाधान आवताडे आघाडीवर आहेत, तर आता मंगळवेढा हा त्यांचाच मतदारसंघ आहे, ते तेथील भूमिपुत्र आहेत. त्यामुळे, मंगळवेढ्यात आघाडी घेऊन ते निश्चितच विजयी होतील, असे पडळकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.  

टॅग्स :भाजपापंढरपूरपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021सोलापूर