Join us  

...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 8:42 PM

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६  व्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्यावतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुंबई-

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६  व्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्यावतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उफस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. "बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे नेण्याचं काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या. बाळासाहेब होते म्हणून तसं झालं नाही", असं संजय राऊत यावेळी म्हणाले. 

बाळासाहेबांनी संपूर्ण देशाता एक विचार दिला. आज ते असते तर ९६ वर्षांचे असते. पण त्यांचे विचार आजच्या तरुण पीढीचे विचार होते. आज शिवसेना पक्ष युवांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि युवा पिढी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

विरोधकांकडे केवळ राज्यपालांची वेळ घेण्याचं काम"विरोधक आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त करताना दिसत असले तरी सरकार एकदम ठणठणीत आहे हे आम्ही दाखवून दिलं आहे. विरोधकांना राज्यपालांची वेळ घेऊन राजभवनात जाऊन सरकार बरखास्त करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम राहिलेलं नाही. जरा काही झालं की विरोधक राज्यपालांना भेटायला जातात. आज पाकिस्तानाहून महाराष्ट्रावर धुळीचं वादळ आलं आल्याची बातमी मी वाचली. आता पाकिस्तानातून महाराष्ट्राच्या दिशेनं धुळीचं वादळ आलं म्हणून सरकार बरखास्त करा अशा मागणीसाठी देखील विरोधक राज्यपालांची भेट घेतील", असं टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. 

दिल्लीत बाळासाहेबांचा पुतळा हवा"दिल्लीत आज स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली. त्याचा आम्हाला अभिमानच आहे. सुभाष चंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्याचा विचार दिला. त्यांच्या एवढंच योगदान बाळासाहेब ठाकरे यांनीही स्वातंत्र्यानंतर देशाला दिलं आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा दिल्लीतही होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरे