जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात वाहून आले ऑइल टार बॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 10:45 AM2018-07-20T10:45:32+5:302018-07-20T11:09:31+5:30

4.5 किमीचा जुहू बीच अस्वच्छ

Oil tar balls widely in Juhu beach | जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात वाहून आले ऑइल टार बॉल

जुहू बीचवर मोठ्या प्रमाणात वाहून आले ऑइल टार बॉल

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई - जुहू बीचवर समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ऑइल टार बॉल (ऑईलच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात आज सकाळी वाहून आले आहेत. तसेच यासोबतच बरेचसे प्लास्टिकही मोठ्या वाहून आले आहे. सुमारे 4.5 किमीचा जुहू बीच अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे रोज येथे मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांची निराशा झाली आहे.

गेली 10 वर्षे सी गार्डीयन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कनोजिया सकाळी 6.30 वाजता जुहू चौपाटीवर येतात आणि या बीचची आज स्थिती काय आहे याची माहिती ते थेट पंतप्रधान, राष्ट्रपती व अनेक मान्यवरांना सोशल मीडियावरून देत असतात. मागील तीन चार दिवस येथे सकाळी समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिकबरोबरच ऑइल टार बॉल देखील येथील समुद्रकिनारी वाहून आले आहेत. त्यामुळे जुहू बीच काळवंडलेला दिसत असल्याची माहिती कनोजिया यांनी दिली.

खोल समुद्रात मोठी मालवाहू व तेलवाहू जहाजे असतात. त्यामधील ऑइल समुद्रात मिसळते आणि मग भरतीत हे ऑइल टार बॉल विशेष करून पावसाळ्यात समुद्र किनारी वाहून येतात. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बीचवर चालताना या ऑइल टार बॉल चा खूप उग्र वास येतो आणि कपड्याला लागल्यास लवकर निघत नाहीत अशी माहिती  कनोजिया यांनी लोकमतला दिली. गेल्या 20 जूनपासून राज्य सरकारने केलेल्या प्लास्टिक बंदीचा काही परिणाम बीचवर जाणवतो का असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, अजिबात नाही. उलट भरतीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच रोज वाहून येतं. 

पालिकेचे जुहू बीच साफसफाई करणारे कंत्राटदार जुहू बीचची वरवर सफाई करतात, मात्र समुद्रकिनारी वाहून आलेले प्लास्टिक काढत नाही आणि परिणामी परत कचरा समुद्रात वाहून जातो. राज्य सरकारचा प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असला तरी प्लास्टिक बंदी ही अंशत: न करता पूर्णपणे केली पाहिजे. तसेच समुद्रात गटारातून वाहून येणाऱ्या प्लास्टिकला मुंबई महानगर पालिकेने गटाराच्या मुखावरच जाळी बसवून आळा घातला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या संदर्भात कोळी महासंघाचे सरचिटणीस मत्स्य अभ्यासक राजहंस टपके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खोल समुद्रातील देशी-विदेशी मालवाहू किंवा तेल वाहू जहजांमधून झालेल्या तेल गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या जुहू समुद्रकिनारी आल्या असल्याच सांगितलं. तसेच मुंबई हायमध्ये असलेल्या तेल विहीरीमधून तेल काढत असताना होणाऱ्या गळतीमुळे या ऑईलच्या गुठळ्या येथे आल्या असतील असं मच्छिमारांचं म्हणणं असल्याचं म्हटलं आहे. साधारण पावसात समुद्र खवळलेला असतो आणि पाऊस हा दक्षिणेकडून उत्तरेकडे येत असल्यामुळे समुद्राला करंट असतो. त्यामुळेच पावसात भरतीमध्ये या ऑइल गुठळ्या मुंबईतील समुद्रकिनारी आढळतात अशी माहिती टपके यांनी दिली. 

इतर देशात जर आपली जहाजे गेली तर तिकडे आंतरराष्ट्रीय नॉर्मसप्रमाणे जहाजातील टाकाऊ पाणीच काय पण साधा कचरा आणि ऑइलपण सोडता येत नाही. मात्र आपल्याकडील शासकीय यंत्रणा कमकुवत असल्यामुळे अशा घटना नेहमीच घडतात असा आरोप टपके यांनी लोकमतशी बोलताना केला. विधानपरिषदेवर नुकतेच निवडून गेलेले भाजपा आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी या संदर्भात आपण माहिती घेऊन यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर बैठक आयोजित करू अशी माहिती दिली.

Web Title: Oil tar balls widely in Juhu beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई