Join us  

"आता, अजय बारसकरांना उभं केलं"; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 9:36 AM

अंजली दमानिया यांनी अजय बारसकरांचे नाव घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, २४ फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्याचं त्यांनी जाहीर केलं. तर, दुसरीकडे त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही. जरांगे हे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात, असा आरोप बारसकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. त्यावरुन, आता राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

शिशूपालाप्रमाणे जरांगेंचेही १०० अपराध आता भरले आहेत. जरांगे यांनी २३ डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि बाहेर माध्यमांसमोर दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करेन, असे म्हणत बारसकर यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या अधिकाऱ्याने या बैठकीचे रेकॉर्डिंग केले आहे. ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेंचे बिंग फुटेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यामुळे, जरांगे विरुद्ध बारसकर असा सामना रंगला आहे. त्यावरुन, यामागे सरकारचा हात असल्याची टीकाही होत आहे. अंजली दमानिया यांनीही तशीच शंका व्यक्त केली आहे.

जरांगेंनी ताकदीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण, त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे दिसत आहे. आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे. जे जरांगे म्हणत आहेत, तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही. सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला. पण, शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती, असे म्हणत अंजली दमानिया यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. तसेच, अजय महाराज बारसकर यांना सरकारनेच उभं केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

संतांचा अवमान केला - अजय महाराज

मध्यंतरी जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मी अंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे यांनी संतांचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे मी दुःखी झालो. त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे, असेही बारसकर म्हणाले.

‘प्रहार’मधून हकालपट्टी

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते, जरांगेंवर आरोप केल्यानंतर त्यांची ‘प्रहार’मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप : जरांगे

वडीगोद्री (जालना) : तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यांच्यात हिंमत नव्हती, कायद्याचे मला ज्ञान नाही तर कशाला आले सरकारचे प्रतिनिधी? बारसकर यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका, याला तुमच्या हेड ऑफीसने लगेच लाइव्ह घेतलेच कसे? याचा अर्थ यामागे सरकारचा मोठा ट्रॅप आहे, अशा शब्दात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.

टॅग्स :अंजली दमानियामराठा आरक्षणमराठामनोज जरांगे-पाटील