राज्यातील कोणताही प्रकल्प मंजुरीसाठी अडणार नाही; प्रकाश जावडेकर यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 06:10 IST2019-06-08T03:17:23+5:302019-06-08T06:10:58+5:30
मुंबई-ठाणे शहर परिसरात आणि राज्यात अनेक कल्याणकारी प्रकल्प वेगाने सुरू आहेत. पर्यावरणाला कुठेही हानी पोहोचणार नाही. या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे.

राज्यातील कोणताही प्रकल्प मंजुरीसाठी अडणार नाही; प्रकाश जावडेकर यांची ग्वाही
मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रो, रेल्वेचे प्रकल्प, जेट्टी, ट्रान्सहार्बर लिंक, कोस्टल रोड, नद्यांचे शुद्धीकरण, विविध स्मारकांचे काम समाधानकारक असून केंद्राकडे असलेले पर्यावरणविषयक प्रस्ताव मंजुरीअभावी कधीही ताटकळणार नाहीत, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पर्यावरण आणि वन विभागाच्या प्रलंबित प्रस्तावावर चर्चा करताना बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, महाराष्ट्रात जलयुक्त शिवारचे काम उत्कृष्ट झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला. यामध्ये लोकसहभाग मोठा होता. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असाच लोकसहभाग असणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रात विविध कामे करताना वन्यजीवांना धोका निर्माण होणार नाही, त्याचबरोबर जवळपासच्या ग्रामस्थांचे लोकजीवन सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रारंभी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या वेळी सादरीकरण केले. जंगल परिसरात जलयुक्त शिवारसारखी कामे करण्याचा प्रस्ताव, जंगल क्षेत्रातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे करणे, चंद्रपूर जिल्ह्यातील निझामकालीन जंगल क्षेत्राच्या राखीव जागेचा प्रश्न, महानेट प्रकल्पासाठी जंगलातून केबल टाकणे, झुडपी जंगल प्रश्न, इको टुरिझम, पश्चिम घाटाचा पर्यावरणाचा प्रश्न आणि भीमा शंकर जंगल परिसरात ड्रेनेज लाइन टाकण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत माहिती या वेळी देण्यात आली.
प्रकल्प पूर्णत्वाकडे
मुंबई-ठाणे शहर परिसरात आणि राज्यात अनेक कल्याणकारी प्रकल्प वेगाने सुरू आहेत. पर्यावरणाला कुठेही हानी पोहोचणार नाही. या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने पर्यावरणविषयक विविध परवानग्या दिल्याने आज हे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. नव्याने काही प्रकल्प सुरू असून त्याबाबतीत केंद्र सरकारकडून परवानग्या आणि निधीची उपलब्धता लवकरच होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.