Join us  

'मुंबईत सायबर हल्ला झाला नाही, गृहमंत्र्यांनी चुकीचा अहवाल विधिमंडळात मांडू नये'

By महेश गलांडे | Published: March 03, 2021 1:59 PM

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली

ठळक मुद्देमुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली

मुंबई - राजधानी मुंबईच्या महानगर क्षेत्रात चीनच्या सायबर हल्ल्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता सायबर सेलने व्यक्त केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केली. १२ ऑक्टोबर रोजीची ही घटना आहे. मात्र, याबाबत माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडताना सरकारच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी कुठलाही सायबर हल्ला झाला नसल्याचं केंद्राच्या ऊर्जा विभागाने स्पष्ट केलंय, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. 

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज खंडित झाल्यानंतर ऊर्जा विभागाने सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली  होती. त्यानंतर सायबर सेलने स्काडा सिस्टीमच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत तो सायबर हल्ला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. परदेशी अकाउंटमधून आठ जीबी डाटा राज्य विद्युत मंडळाच्या सर्व्हरमध्ये पाठविला; तसेच, प्रतिबंधित खात्यांतून विद्युत मंडळाच्या सर्व्हेमध्ये लॉग इन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. शिवाय, १४ ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, असे अहवालात म्हटल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. त्यानंतर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वृत्त फेटाळले असून अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  मुंबईतील ब्लॅकआऊटसंदर्भात, केंद्राच्या उर्जा खात्याने कोणताही सायबर हल्ला नसून या मानवी आणि मेकॅनिकल त्रुटी आहेत असं घोषित केलं आहे. ऊर्जामंत्री आणि गृहमंत्री यांनी आधी तांत्रिक बाबी तपासून घेतल्या पाहिजे. सायबर हल्ला झाला आहे, असा चुकिचा अहवाल विधानमंडळात मांडू नये, असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी आपली भूमिका मांडली.   

टॅग्स :अनिल देशमुखमुंबईनितीन राऊतवीज