Join us  

अक्षय, तू आता कार वापरत नाहीस का?; ९ वर्षांपूर्वीच्या 'त्या' ट्विटवरून आव्हाडांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:28 AM

अभिनेता अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवरून सवाल

ठळक मुद्देनऊ वर्षांपूर्वी अक्षयनं केलेल्या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांचा सवालइंधन दरवाढीवरून आव्हाडांचे अक्षय कुमारला खोचक प्रश्नइंधनाच्या वाढत्या दरांवरून विरोधक आक्रमक

ठाणे: मोदी सरकारवर सातत्यानं निशाणा साधणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता मोदी समर्थकांच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे. इंधन दरवाढीवरून सरकारला लक्ष्य करणाऱ्या आव्हाडांनी आता अभिनेता अक्षय कुमारला उपरोधिक शैलीत टोले हाणले आहेत. अक्षय कुमारनं ९ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटवरून आव्हाडांनी चिमटा काढला आहे. आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. २०११ साली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारनं एक ट्विट केलं होतं. 'मुंबईकरांनी पेट्रोल पुन्हा महागण्याआधी पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्यानं मला रात्री घरीही जाता आलं नाही,' असं अक्षयनं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आव्हाड यांनी याच ट्विटला टॅग करून अक्षयला खोचक प्रश्न विचारले आहेत.'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलं आहेस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, हे मी तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो आहे,' असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. नऊ वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवर बोलणाऱ्या अक्षयनं आताही व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील तोटा भरून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सलग १९ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात ८.६६ रुपयांची, तर डिझेलच्या दरात १०.३९ रुपयांची वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोलपेक्षाही जास्त झाला आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होणार असून त्यामुळे महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअक्षय कुमारपेट्रोलडिझेल