Join us  

१०० टक्के क्षमतेचे नाट्यगृह सुरू करा; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:55 AM

५० टक्के नाही तर १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी खासदार डॉ. अमोर कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. 

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट अद्यापही कायम असताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र, राज्यातील बहुतांश निर्बंध शिथील करण्यात आले असून, चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, याबाबत मागणी केली जात आहे. यातच आता ५० टक्के नाही तर १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोर कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर ते न करता थिएटर १०० टक्के क्षमतेने सुरु करावीत. ५० टक्के क्षमतेने थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारे नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरु करा, असे अमोल कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी

कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले विविध निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात या क्षेत्रातील विविध संघटना आणि संस्थांकडून शासनाला विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

दरम्यान, सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी असेल. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील, यांसारखी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेउद्धव ठाकरेनाटक