- राज चिंचणकरमुंबई : तब्बल साडेतीन शतकांपूर्वीचे स्वयंभू स्थान असलेली आदिमाया जरीमरी देवी वरळीच्या डोंगरमाथ्यावर वास्तव्य करून आहे. मात्र हे स्थान गेल्या काही दशकांतच नावारूपाला आले आहे.सन १९७६ मध्ये मुंबईत पावसाने धिंगाणा घातला होता. त्या वेळी वरळीच्या डोंगरावर स्थित या देवीच्या एका बाजूची कडा कोसळली होती. १९७९ मध्ये तेथील गणेशोत्सव मंडळाने जीर्णोद्धार समिती नेमली आणि १९८४ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या जागी देवी स्थानापन्न होण्यास राजी नाही, अशी भावना बनल्याने भाविकांनी देवीला कौल लावला. तेव्हा देवीने, ती पूर्वी ज्या उंचीवर होती; तिथेच तिची स्थापना करण्यात यावी असा कौल दिला. त्यामुळे मंदिरातील मोठ्या खांबातून मूळ डोंगराची माती अपेक्षित उंचीपर्यंत नेऊन त्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली, असे सांगण्यात येते. काळाच्या ओघात येथील डोंगर सहज दृष्टीस पडत नसला, तरी या मंदिरात जाण्यासाठी आजही ४३ पायऱ्या चढाव्या लागतात.या मंदिरात २५ किलो वजनाचा चांदीचा वाघ असून त्याच्या समोरच शेंदरी मुखवट्याच्या स्वरूपात जरीमरी मातेचे दर्शन होते. देवीचा सुवर्णमुकुट, चांदीची प्रभावळ आणि तिच्यासह असलेल्या देवीच्या रक्षणकर्त्या मूर्तीही येथे लक्ष वेधून घेतात.
Navratri : डोंगरमाथ्यावरील वरळीची आदिमाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:08 IST