Join us  

निसर्ग  : भरपाई देण्याच्या शासन परिपत्रकात मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 5:09 PM

मच्छिमारांमध्ये संतापाची लाट

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई :  निसर्ग चक्री वादळाचा तडाखा कोकणातील जिल्ह्यांना बसला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने दि. १० जून  रोजी शासन निर्णय परिपत्रक प्रसिध्द केला आहे. त्यात १ ते ७ मुद्यांत फक्त घरांचे झालेल्या नुकसानीचा, झोपड्यांचा, दुकानदार, टपरी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहिर केले आहे.  या परिपत्रकात मच्छिमारांच्या नौकांचे, इंजिनचे, जाळ्यांचे, मासेमारी साहित्य व मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीचे नुकसान झालेले असतांना त्याचा अजिबात समावेश करण्यात आला  नसल्यामुळे मच्छिमारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तीन-चार चक्री वादळात झालेले नुकसान भरपाई देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदारांमार्फत माहिती गोळा केल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाला साडे सात कोटी, इतर जिल्ह्यांत सात-आठ कोटींचे नुकसानीचा अहवाल सादर केलेला आहे. गेल्या वर्षाच्या वादळामुळे मच्छिमारांचे ५० कोटींचे भरपाई मिळायला हवी होती. ती अद्याप मिळाली नाही. या चक्री वादळात मच्छिमारांचे२० ते २५ कोटींचे नुकसान झालेले आहे. कोविड-१९ च्या संकटामुळे मासेमारी व्यवसाय संपूर्ण उध्वस्त झाला आहे. मच्छिमार समाज उपासमारीला तोंड देत आहे. मागील ५० कोटींची भरपाई व चक्री वादळाची २५ कोटी भरपाई राज्य शासनाने त्वरित मंजूर करावी म्हणून मच्छिमारांसाठी नव्याने वेगळे परिपत्रक महसूल व वन विभागाने मंजूर करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्री वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा करताना अनेक मच्छिमार गावांना भेटी दिल्या होत्या. नंतर मच्छिमार समाजाचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. विशेषत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मच्छिमारांच्या नौका बुडाल्या असल्यामुळे इंजिनाचे व मासेमारी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय उभा करावा लागेल. त्यांची नौका दुरुस्ती, इंजिन दुरुसचा खर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे. मच्छिमारांना आर्थिक मदत मिळाली नाही तर मासेमारी व्यवसायच करू शकणार नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. गेले वर्षभर मासेमारी व्यवसायच न झाल्यामुळे व कोरोनाच्या महामारीमुळे मच्छिमार समाज उपासमारीला तोंड देत आहे. मग मत्स्य शेती करणार मच्छिमारांना उपेक्षित का ठेवले आहे ? असा सवाल दामोदर तांडेल यांनी शासनाला विचारला आहे. महसूल व वन विभागाने दि. १० जूनच्या परिपत्रकात मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याचा उल्लेख का नाही असा सवाल त्यांनी केला आहे. 

रायगडचे जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे ह्यांच्या निर्दशनास ही गोष्ट आणल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आजच चर्चा करून या चक्री वादळात मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचे वेगळे परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षात तीन-चार वादळांमुळे झालेले ५० कोटींचे नुकसान भरपाई व चक्रीवादळामुळे २५ कोटींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेऊन मच्छिमारांच्या नुकसान भरपाई देण्याचे वेगळे महसूल व वन विभागाने परिपत्रक मंजूर करून मच्छिमार समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाला केली आहे.

टॅग्स :चक्रीवादळनिसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्रपाऊस