Join us  

मोदींच्या काळात जगातील मंदी उठली आणि भारतात आली, बाळासाहेब थोरात यांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 7:45 PM

मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत जगात मंदी आली असतानाही त्याच्या झळा भारताला बसल्या नाहीत. आता नरेंद्र मोदींच्या काळात नेमकी उलट स्थिती झाली आहे.

मुंबई : मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत जगात मंदी आली असतानाही त्याच्या झळा भारताला बसल्या नाहीत. आता नरेंद्र मोदींच्या काळात नेमकी उलट स्थिती झाली आहे. जगातील मंदी उठली आणि आपल्या देशात आली, असा आरोप महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केला. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणारे 'मनमोहन पर्व' या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार हेमंत देसाई यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित प्रकाशन सभारंभास आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, लेखक आणि विचारवंतांचा समाजावर दीर्घकाळ परिणाम होत असतो. १९९० च्याही आधीपासून देशाच्या अर्थकारणावर मनमोहन सिंगांचा मोठा प्रभाव होता. अगदी २०१४ पर्यंत देशातील प्रत्येक वळणावर त्यांचा प्रभाव होता. मनमोहम सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात तर जगात मंदी असतानाही भारताला त्याच्या झळा बसल्या नाहीत. आता मात्र स्थिती उलट झाली आहे. 

जगातली मंदी उठली आणि आपल्या देशात आली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जी लोकहिताची कामे केली ती मतदारांपर्यंत पोहचविण्यात आम्ही अपयशी ठरलो. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक आघाडीवर मजबूत करण्याचे काम केले.२०१४ च्या राजकीय वावटळीत सिंग यांचे व्यक्तिमत्व काहीसे झाकोळले होते. पण आता ते पुन्हा झळाळून निघाल्याचे आपण पाहत आहोत. शेअर मार्केटवाले आजही मोदींची आरती करत असले तरी आठवण मात्र मनमोहम सिंगांची काढतात. याचे कारण त्यांचे अर्थकारण असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश का मिळाले नाही, याचा पक्ष म्हणून आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. पण, केंद्रात सत्ता असताना सामाजिक दाम दंड भेद वापरूनही भाजपला यश मिळाले नाही. लोकांनी भाजपचे भेदाचे, धार्मिक विद्वेषाचे राजकारण लोकांनी नाकारले. आगामी काळात हीच परंपरा कायम राहिल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

तर, मनमोहन सिंग यांच्या अर्थनितीसोबत त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा मनमोहन पर्व या पुस्तकात घेण्यात आला आहे. ४४ वर्षे सिंग देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय आहेत. देशाच्या अर्थखात्यातील जवळपास सर्व महत्वाची पदे त्यांनी भूषविल्याचे भालचंद्र मुणगेकर म्हणाले. यावेळी विश्वास उटगी, भाई जगताप यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतअर्थव्यवस्थाबाळासाहेब थोरात