Join us  

'हे वागणं बरं नव्हं', पुत्र नितेशच्या चिखलफेक आंदोलनावर नारायण राणे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 5:36 PM

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला.

मुंबई - महामार्गाच्या दुरवस्थेसाठी आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवले. तसेच महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी त्यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. मात्र, पुत्र नितेश राणेंच्या या कृतीवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली आहे.  

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. आमदार नितेश राणेंनी शेडेकर यांच्यावर चिकलफेक केली. गेल्या काही दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी  खड्डे पडले आहेत. तसेच महामार्गाच्या कामामुळे वेळी झालेल्या चुकांमुळे काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेत रस्त्याची वस्तुस्थिती दाखवली. तसेच त्यांना गडनदीवरील पुलाला बांधून ठेवले. त्यानंतर महामार्गाच्या कामामुळे पडलेले खड्डे आणि चिखलासाठी उपअभियंता शेडेकर यांना जबाबदार धरत त्यांना चिखलाची आंघोळ घातली.

मात्र, पुत्राच्या या चिखलफेक आंदोलनावर नारायण राणेंनी नाराजी दर्शवली आहे. नितेशचं हे वागणं चुकीचं आहे. महामार्गांसदर्भातील आंदोनल योग्य आहे, पण आंदोलनाचा मार्ग आणि कृती चुकीची असल्याचे नारायण राणेंनी म्हटलंय. हिंसाचार अन् गोंधळातील या आंदोलनाचे मी कदापी समर्थन करत नसल्याचे नारायण राणेंनी म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या स्वाभीमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यातून नेमका काय बोध घ्यावा, असा प्रश्न आहे. 

टॅग्स :नारायण राणे नीतेश राणे सिंधुदुर्ग