Join us  

नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:50 PM

नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. 

मुंबई: नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून यात त्यांनी नालासोपारामधील कोरोना रुग्णांच्या मृत्यूला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. (Nallasopara Nine COVID 19 patients die in a day BJP Kirit Somaiya claims murder due to oxygen shortage)

"मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील विनायक हॉस्पीटलमध्ये सोमवारी एकाच दिवशी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे मृत्यू हॉस्पीटलमधील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रृटीमुळे झाले आहेत. त्यामुळे हे मृत्यू नसून ठाकरे सरकारनं केलेली हत्या आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा", अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

दरम्यान, विनायक हॉस्पीटलमधील मृत्यू हे ऑक्सिनजच्या तुटवड्यामुळे झाल्याचे वृत्त पालघर पोलिसांनी फेटाळून लावले आहे. अशाप्रकारची अफवा पसरवली जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. "हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याची अफवा येथील परिसरात पसरली. त्यामुळे हॉस्पीटलबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. हॉस्पीटलबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे", असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. येथील परिस्थितीवर तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं लक्ष असल्याचंही सांगण्यात आलं आहे. संबंधित रुग्णांचा मृत्यू त्यांचं वय अधिक असल्यानं आणि त्यांना सहव्याधी असल्यानं त्यात कोरोनाची लागण झाल्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.   

टॅग्स :किरीट सोमय्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र