मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:46 IST2025-06-09T16:32:17+5:302025-06-09T17:46:31+5:30
मुंबईत लोकल रेल्वेचे २० वर्षात ५१ हजार ८०२ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी
Mumbai Train Accident: सोमवारी सकाळी ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमधून १३ प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात चार प्रवाशांचा नाहक बळी गेला. मृतांमध्ये एका रेल्वे पोलिसाचाही समावेश आहे. ही घटना सकाळी ९:३० वाजता दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान घडली जेव्हा ट्रेन कसाराकडे जात होती. अपघातात सापडलेले सर्वजण ट्रेनच्या दाराववर उभे होते अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दुसरीकडे, मुंब्रा स्थानकात जलद मार्गावर असलेल्या धोकादायक वळणामुळे हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणं आहे. त्यामुळे आता या अपघातानंतर पुन्हा लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आकडेवारीनुसार मुंबई लोकलच्या प्रवासामध्ये दररोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू होत असल्याचे समोर आलं आहे.
दिवा मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र दररोज सात रेल्वे प्रवासी आपला जीव गमावत असल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे. अशाच प्रकारे गेल्या २० वर्षांत हजारो प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. २००५ ते जुलै २०२४ पर्यंत ५१,८०२ लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये लोकांचे प्राण गेले आहेत. ५१,८०२ मृत्यूंपैकी २२,४८१ जणांचा मृत्यू पश्चिम रेल्वेवर आणि २९,३२१ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वर झाला आहे. यापैकी कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवली या चार स्थानकांदरम्यान असलेल्या स्टेशनवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. विरार येथील प्रवासी यतीन जाधव यांच्या याचिकेवर उत्तर देताना पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली होती.
सध्या, पश्चिम रेल्वेवर एकूण १,३९४ उपनगरीय गाड्या आहेत ज्यातून दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. तर मध्य रेल्वेवर १,८१० उपनगरीय गाड्या आहेत ज्यातून दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करतात. त्याच दरम्यान, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज सरासरी ७-८ प्रवाशांचा मृत्यू होतो. २०२४ मध्येच आतापर्यंत २,४६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २० वर्षांत रेल्वे अपघातात ५०,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
आकडेवारीनुसार २०२३ मध्ये २,५९० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी एकूण १,१५१ जणांचा ट्रॅक ओलांडताना मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेले अपघात हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे आणि ठाणे आणि बोरीवली स्थानके यामध्ये सर्वात वर आहेत. तर २०२३ मध्ये, कल्याणमध्ये ट्रेनमधून पडून ११४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. वसई स्थानकादरम्यान ४५ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला.
दुसरीकडे, २००९ ते जून २०२४ दरम्यान २९,३२१ जणांना आपला जीव गमवावा लागला, असे मध्य रेल्वेने म्हटले. बहुतेक अपघात हे रुळ ओलांडल्यामुळे झाले तर काही गर्दीमुळे प्रवासी बाहेर पडल्यामुळे झाले. त्यातील काही अपघात रेल्वे रुळाला लागून असलेल्या खांबांमुळे आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फूटबोर्डमधील जागेत खाली पाडल्यामुळे झाले आहेत. गेल्या १५ वर्षांत, प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवताना, मृतांची संख्या कमी करण्यात आम्हाला यश आल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले होते.