मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास महागणार, भाडेवाढीचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:42 IST2017-12-21T01:42:10+5:302017-12-21T01:42:27+5:30

आर्थिक संकटात असल्याने अखेर तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने आज मंजूर केला. रिक्त पदे व आस्थापना खर्च कमी करणे, बसमार्गांमध्ये सुधारणा, लांबच्या प्रवासाचे भाडे वाढवणे अशा सुधारणांसह या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

 Mumbaikar's 'best' journey will be expensive, fare hike budget | मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास महागणार, भाडेवाढीचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास महागणार, भाडेवाढीचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई : आर्थिक संकटात असल्याने अखेर तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने आज मंजूर केला. रिक्त पदे व आस्थापना खर्च कमी करणे, बसमार्गांमध्ये सुधारणा, लांबच्या प्रवासाचे भाडे वाढवणे अशा सुधारणांसह या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
सन २०१८-२०१९चा ८८० कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प गेल्या महिन्यात बेस्ट समितीने मांडला. मात्र हा अर्थसंकल्प प्रथेनुसार शिलकीचा दाखवून मगच बेस्ट प्रशासनाला पालिका महासभेपुढे पाठविता येणार होता. त्यानुसार ५४६१.३७ कोटी उत्पन्न व ५४६१.३६ कोटी रुपये खर्च दाखवून एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने मंजूर करून स्थायी समितीकडे पाठविला. मात्र यामध्ये ६ ते ३० किलोमीटरपर्यंत १ ते १२ रुपये या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. याविरोधात विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी या चर्चेनंतर सभात्याग केला.
दोन वर्षांचे अर्थसंकल्प सभागृहात
आर्थिक तोट्यात आलेल्या बेस्टने गेल्या वर्षी ५९० कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. मात्र एक लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रथा असल्यामुळे पालिकेने तो अद्याप मंजूर केला नाही. त्यामुळे आता पालिका सभागृहाला २०१७-१८ आणि २०१८-१९ अशा दोन वर्षांच्या अर्थसंकल्पावर निर्णय घ्यावा लागणार आहे.
पालिकेकडून ३७७ कोटींचे अनुदान -
बेस्ट प्रशासनाने ८८०.८८ कोटी तुटीचा अर्थसंकल्प समितीसमोर ठेवला होता. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विविध कडक उपाययोजनांचा कृती आराखडा बेस्टला सादर केला होता. या आराखड्यातील काही तरतुदी समितीने मंजूर केल्यामुळे बेस्टची तूट ५०४.१८ कोटींनी कमी झाली. आराखड्यातील उपाययोजना केल्यानंतर जी तूट शिल्लक राहते ती आणि कामगारांच्या बोनसचा निधी असे मिळून ३७६.७० कोटी पालिकेने अनुदान द्यावे, अशा गृहीतकावर हा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.
अशी होणार वार्षिक बचत-
प्रवासी बस भाडेवाढ - ५३.३५ कोटी उत्पन्न वाढणार
बसपास दरांत वाढ - १० कोटी ५० लाख उत्पन्न वाढणार
बसताफा पुनर्नियोजन - ३१२ कोटी बचत
आनंददायी योजना बंद करून सहा कोटी 88 लाख
रुपये बचत
कर्मचाºयांचे भत्ते गोठविले - १२१ कोटी ९० लाख वाचणार

Web Title:  Mumbaikar's 'best' journey will be expensive, fare hike budget