मुंबईच्या कांदिवलीतील आकुर्ली परिसरात म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पैशाच्या कारणावरून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर संबंधित महिलेने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊस उचलले, असे सांगण्यात आले. पंरतु, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांची पत्नी रेणू कटरा (वय, ४४) यांनी राहत्या घरात गळाफास लावून आत्महत्या केली. पैशाच्या कारणावरून बापू कटारे आणि त्यांच्या पत्नीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी रात्री पुन्हा एकदा भांडण झाले आणि रेणू यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
रेणू यांच्या आत्महत्यानंतर त्यांचा भाऊ नितीन शेवाळ यांनी तिचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा दावा केला आहे. रेणुका यांनी सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा शेवाळ यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. राज्यात विवाहित महिलांच्या आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ माजली आहे.