Join us  

...तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार, शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही - विश्वास नांगरे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 1:26 PM

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे. 

ठळक मुद्देकेंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीनही कायद्यांना विरोध करत देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत.राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे. 

मुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीनही कायद्यांना विरोध करत देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची तमा न बाळगता, हे कायदे मागे घेण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्याआझाद मैदानावर जमले आहेत. राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे. 

यासंदर्भात बोलताना मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले, माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही. यासंदर्भात आम्ही मोर्चाशी संबंधित शिष्टमंडळ आणि नेतेमंडळींची भेट घेतली आहे. त्यांना समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मात्र, राजभवणावर जाण्याचा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. त्यांनी राजभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे शिष्टमंडळ राजभवनापर्यंत घेऊन जाऊ, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत 800च्यावर पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आंदोलक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच फेस मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग पाळावे. यासंदर्भात आम्हीही वारंवार आंदोलक शेतकऱ्यांना सूचना देत आहोत. ”, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले.

राजू शेट्टीच्या स्वाभीमानीचा आंदोलनात सहभागशेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीसांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितलंय. गेल्या जून महिन्यांपासून आम्ही सातत्याने या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करत आहोत, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच आम्ही करत नाहीत, असे म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. तसेच, विरोधी पक्षांचा आंदोलनातील सहभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याने आपण नाराज असल्याचंही शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? -केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. 

शेतकऱ्यांचं आंदोलन हा 'पब्लिसिटी स्टंट' -यातच, "मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही", असे मोठे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

 

टॅग्स :शेतकरी संपपोलिसविश्वास नांगरे-पाटीलमुंबईआझाद मैदान