मुंबई विद्यापीठाने तुषार गांधी यांना प्रवेशद्वारावर रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:27 IST2026-04-01T06:27:14+5:302026-04-01T06:27:41+5:30
कलिना संकुलात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू

मुंबई विद्यापीठाने तुषार गांधी यांना प्रवेशद्वारावर रोखले
मुंबई : मुंबई विद्यापीठात आंदोलनकर्ते भदंत विमांसा यांच्या भेटीसाठी गेलेल्या महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना प्रवेश नाकारण्यात आला. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीका होत आहे.
पाली विभागाचा वारसा भाषा व सांस्कृतिक अध्ययन उत्कृष्टता केंद्रात समावेशाला विरोध, तसेच पाली विभागाला स्वतंत्र जागा द्यावी, या मागणीसाठी भदंत विमांसा यांनी मुंबई विद्यापीठात आंदोलन पुकारले आहे. तोडगा निघाला नसल्याने त्यांचे विद्यापीठाच्या कलिना संकुलात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील नेते हे विद्यापीठात येत आहेत. भदंत विमांसा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी तुषार गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला हे आले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखले. यापूर्वी भदंत विमांसा यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन व अमेय आंबेडकर हे मुंबई विद्यापीठात आले होते. त्यावेळी त्यांनाही प्रवेशद्वारावर रोखले होते.