मुंबई लोकल अपघातात तब्बल १४ हजार मृतदेह बेवारस, कुणी विचारायलाही येईना! चिंताजनक आकडेवारी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:16 IST2025-06-24T15:14:12+5:302025-06-24T15:16:05+5:30
मुंबई महानगर प्रदेशात लोकल अपघातात गेल्या १५ वर्षातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृतदेह हे बेवारस राहिल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

मुंबई लोकल अपघातात तब्बल १४ हजार मृतदेह बेवारस, कुणी विचारायलाही येईना! चिंताजनक आकडेवारी उघड
मुंबई महानगर प्रदेशात लोकल अपघातात गेल्या १५ वर्षातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृतदेह हे बेवारस राहिल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. जीआरपीच्या अथक प्रयत्नांनंतरही अनेक मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचू शकत नाहीत किंवा कुणी ते स्विकारण्यासाठी समोर येत नाही. रेल्वे अपघातात जीव गमावलेल्या ४६,९६९ मृत्यूंपैकी ३१ टक्के म्हणजे १४,५१३ मृतदेह बेवारस म्हणून नोंद झाले आहेत.
रेल्वे अपघातातील प्राण गमावलेल्या बेवारस मृतदेहांचं प्रमाण हे २०१९ सालापासून वाढत जात असल्याचं ऑर्थोपेडिक डॉ. सारोश मेहता यांनी मिळवलेल्या माहिती अधिकाराच्या अहवालातून समोर आलं आहे. रेल्वे अपघातात बऱ्याचदा मृतदेहांची ओळख पटवण खूप कठीण जातं. मृतदेहांची अवस्था कधी-कधी इतकी वाईट असते की ओळख पटवता येत नाही. तर कधी त्यांच्याजवळ कोणतेची पुरावे जसे की ओळखपत्र आणि मोबाइलही आढळून येत नाही, अशावेळी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेणं कठीण जातं असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
गेल्या ५ वर्षातील आकडेवारी...
वर्ष- २०२०
एकूण मृत्यू- १११६
ओळख पटलेले- ८२८
बेवारस- २८८
वर्ष- २०२१
एकूण मृत्यू- १७५२
ओळख पटलेले- १२७९
बेवारस- ४७३
वर्ष- २०२२
एकूण मृत्यू- २५०७
ओळख पटलेले- १८१८
बेवारस- ६८९
वर्ष- २०२३
एकूण मृत्यू- २५९०
ओळख पटलेले- १८७२
बेवारस- ७१८
वर्ष- २०२४
एकूण मृत्यू- २४६८
ओळख पटलेले- १८६४
बेवारस- ६०४
जीआरपीनं बेवारस मृतदेहांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्यंतरी 'शोध' नावाचं संकेतस्थळ देखील सुरू केलं होतं. ज्यावर ज्या मृतदेहांची ओळख पटत नाही त्यांचे फोटो आणि उपलब्ध माहिती अपलोड केली जात होती. जेणेकरुन संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यास कदाचित मदत होईल. पण हा प्रकल्प कालांतराने बंद करण्यात आला. याशिवाय बेवारस मृतदेहांची माहिती देणारे मृत्युमुखींचे फोटोसकट बॅनर रेल्वे स्थानकावर लावले जात होते. पण हे फोटो आपत्तीजनक असल्याची प्रवाशांनी भावना व्यक्त केल्यानंतर असे बॅनर लावणं देखील बंद केलं गेलं.
"रेल्वे अपघतातील मृतदेहांची ओळख पटवण जेव्हा कठीण होतं तेव्हा असा मृतदेह शवागृहात १५ दिवस ते महिनाभरापर्यंत ठेवण्यात येतो. त्याचे फोटो महानगर प्रदेशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले जातात. जेणेकरुन एखाद्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नमूद झाली असेल तर त्यानुसार तपास करुन मृतदेहाची ओळख पटू शकेल. पण त्यानंतरही कुणी आलंच नाही तर प्रशासनाकडूनच संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात", असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. अशावेळी मृतदेहाचे कपडे, वस्तू आणि फोटो रेकॉर्डमध्ये ठेवला जातो. जेणेकरुन भविष्यात नातेवाईकांचा शोध लागला किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली तर माहिती उपलब्ध होऊ शकेल, असंही ते म्हणाले.