लोकलसाठी स्वतंत्र मार्ग धूसरच; प्रवाशांची टीका, अनेक प्रकल्प रखडल्याने सेवा वाढविणे अशक्यच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:29 IST2025-06-12T13:29:16+5:302025-06-12T13:29:21+5:30
Mumbai Suburban Railway: मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी समर्पित मार्गिका तयार करण्यासाठी २००८ मध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला मंजुरी मिळाली होती. परंतु, जमीन संपादन, प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी होणाऱ्या विलंबामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे.

लोकलसाठी स्वतंत्र मार्ग धूसरच; प्रवाशांची टीका, अनेक प्रकल्प रखडल्याने सेवा वाढविणे अशक्यच
मुंबई - मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी समर्पित मार्गिका तयार करण्यासाठी २००८ मध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला मंजुरी मिळाली होती. परंतु, जमीन संपादन, प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी होणाऱ्या विलंबामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे. तर, कल्याण ते टिटवाळा, आसनगाव आणि कल्याण ते अंबरनाथ, बदलापूरदरम्यान फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागा नसल्याचे कारण रेल्वे देत आहे. त्यामुळे १५ डब्यांच्या फेऱ्यांचा विस्तार रखडला आहे. परिणामी लोकलसाठी स्वतंत्र मार्गासह १५ डब्यांच्या लोकलचे स्वप्न धूसरच असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लोकलना प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ‘लाइफ’ घेणारी ठरत आहे. रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे प्रवासी आणि संघटनांचे म्हणणे आहे. अशाच रखडलेल्या अनेक प्रकल्पांचा फटका लोकल सेवांना बसत आहे.
कुर्ला ते परळ आणि परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) अशा दोन टप्प्यांत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा विस्तार होत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यासाठी जमीन संपादनासाठी नेमलेल्या संस्थांकडून विलंब होत असल्याने प्रकल्प सुरू होण्यास अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी कुर्ला ते परळदरम्यान ७१४ प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन, तर दुसऱ्या टप्प्यांतील परळ ते सीएसएमटीदरम्यानच्या जमिनीवरील ५५० प्रकल्प बाधितांचे पुनर्वसनचे काम अद्याप सुरूच झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्लॅटफॉर्मची रुंदी वाढणार कधी?
सध्या मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या चालविल्या जात असून, त्यात १५ डब्यांच्या केवळ २२ फेऱ्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या २११ फेऱ्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेने कल्याण ते टिटवाळा, आसनगाव आणि कल्याण ते अंबरनाथ, बदलापूर दरम्यान फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत १५ डबा फेऱ्यांचा विस्तार टाळला. कल्याण ते आसनगाव / बदलापूरदरम्यान १५ डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी पुरेशी नाही.
त्याचबरोबर सिग्नल यंत्रणेसह अन्य यांत्रिक बाबी हटवण्याची आवश्यकता आहे, अशी अनेक कारणे पुढे करत मध्य रेल्वेकडून वारंवार पुढे करण्यात येत आहे. जर मार्गिकांचा विस्तार आणि प्लॅटफॉर्मची लांबी वेळेत वाढवली असती, तर मुंब्रा येथील घटना टाळता आली असती असे प्रवाशांचे म्हणणे आहे.