लोकल एसी केल्यानंतर भाडे १५ की १०५ रुपये? एसीसाठी अतिरिक्त रक्कम मोजणारा प्रवासी वर्ग नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:55 IST2025-06-12T07:55:41+5:302025-06-12T07:55:48+5:30
AC Local News: साध्या लोकल एसी केल्या तरी त्याचे भाडे १५ रुपये राहणार का? सध्याच्या एसी लोकलएवढे ते भाडे नसावे. जर सध्याच्या साध्या लोकलचे भाडे आकारणी होणार असेल तर आता ज्या ८० एसी लोकल फेऱ्या आहेत त्यांचे भाडे लगेच कमी करावे. जेणेकरून सर्वांना सुसह्य प्रवास आताच मिळेल आणि दिलासा मिळेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

लोकल एसी केल्यानंतर भाडे १५ की १०५ रुपये? एसीसाठी अतिरिक्त रक्कम मोजणारा प्रवासी वर्ग नाराज
डोंबिवली - डोंबिवली, कल्याणवरून मुंबईला जाण्याकरिता दुसऱ्या वर्गाच्या लोकलचे तिकीट १५ रुपये आहे, तर एसी लोकलचे तिकीट १०५ रुपये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लोकल एसी असतील व तिकीट दरात कोणतीही भाडेवाढ करणार नाही, असा जो दावा केला आहे तो सध्याच्या एसी लोकल भाड्याबाबत आहे की सामान्य भाड्यासंदर्भात आहे ते स्पष्ट करण्याची आवश्यकता प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. साध्या लोकल एसी केल्यावर सध्याच्या भाड्यातील ही तफावत कशी दूर करणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली.
साध्या लोकल एसी केल्या तरी त्याचे भाडे १५ रुपये राहणार का? सध्याच्या एसी लोकलएवढे ते भाडे नसावे. जर सध्याच्या साध्या लोकलचे भाडे आकारणी होणार असेल तर आता ज्या ८० एसी लोकल फेऱ्या आहेत त्यांचे भाडे लगेच कमी करावे. जेणेकरून सर्वांना सुसह्य प्रवास आताच मिळेल आणि दिलासा मिळेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. अर्थात ज्यांनी सुटसुटीत व आरामदायी प्रवासासाठी एसी लोकलचे तिकीट अथवा पास काढले आहेत त्यांच्यावर यामुळे अन्याय होणार आहे. एसीचे तिकीट बरेच कमी केले तर सर्वसामान्य लोकलसारखी गर्दी एसी लोकलमध्ये होईल. त्यामुळे ज्या प्रवाशांना लॅपटॉपवर काम करीत किंवा मोबाइलवर झूम मीटिंग ॲटेंड करत मुंबईला जायचे आहे व त्याकरिता ते अतिरिक्त रक्कम मोजायला तयार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे त्या प्रवाशांचे मत आहे.
सध्याच्या एसी लोकलचे भाडे रेल्वेने कमी करून प्रवाशांना दिलासा द्यावा. कल्याण ते मुंबई साध्या लोकलचा दुसऱ्या वर्गाचा पास ३१५ रुपये आहे त्याठिकाणी एसीचा महिन्याचा पास २१३५ रुपये आहे. त्यामुळे सर्व लोकल एसी झाल्यावर भाडे कमी करावे लागेल, तरच प्रवाशांना दिलासा मिळेल.
- मनोहर शेलार, स्थानक प्रवासी
सुविधा समितीचे माजी सदस्य, मध्य रेल्वे