लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आखातातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई वाढत असून मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. परळ-भोईवाडा येथील यश-हिरा एन्टरप्रायझेस या भारत गॅस एजन्सीसमोर शुक्रवारी सकाळपासून रांगा लागल्या. यावेळी नागरिकांची एजन्सीचालकाशी वादविवाद झाल्याने तणाव निर्माण झाला. अखेरीस पोलिसांना पाचारण केल्यावर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सिलिंडरचे वाटप सुरू झाले.
गोरेगाव चेकनाका येथील घई गॅस एजन्सीबाहेरही नागरिकांनी सिलिंडर घेऊन मोठ्या रांगा लावल्या होत्या. घरगुती गॅसच्या टंचाईच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याने पेट्रोलपंपांवर परिस्थिती सुरळीत होती.
आखातातील युद्धामुळे देशाच्या गॅसपुरवठ्याला मोठा फटका बसला असून गेल्या महिनाभरापासून तो विस्कळीत झाला आहे. देशांतर्गत घरगुती गॅसचे उत्पादन वाढविण्यात आले असले तरी मुंबईसह राज्यात सिलिंडरची टंचाई तीव्र झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा सुरळीत होत असला तरी ज्या ग्राहकांकडे सिलिंडर आहेत, त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर दररोज सकाळी सिलिंडर घेऊन नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे.
'मेसेज येऊनही सिलिंडरचा पत्ताच नाही'
स्थानिक नागरिक सुरेंद्र घोगळे यांनी सांगितले की, १३ मार्चला मला सिलिंडर मिळणार असल्याचा मेसेज आला. मात्र सिलिंडर घरी न आल्याने एजन्सीत विचारणा केल्यावर येथे सिलिंडर मिळणार नाही, तो घरपोच येईल, असे सांगण्यात आले. तर काहींना एजन्सीपुढे रांगा लावण्यास सांगण्यात आले.
स्थानिकाने सांगितले की, २-४ दिवसांत डिलिव्हरीचा मेसेज येतो; पण सिलिंडर मिळत नाही. काही जणांना बुकिंग न करताही ब्लॅकमध्ये १,५०० रुपयांना सिलिंडर मिळत आहेत.
वादावादीचे प्रसंग
परळ-भोईवाडा येथील यश-हिरा इंटरप्रायझेस या भारत गॅस एजन्सीसमोर शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून अनेक नागरिक रांगेत थांबले होते. मात्र, नागरिकांची गर्दी वाढू लागल्यावर एजन्सीचालकाबरोबर वाद सुरू झाल्याने अखेर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
गाडी न आल्याने पेच; सोमवारनंतर घरी वितरण
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर १० ते १५ दिवस उलटल्यानंतरही त्यांना गॅस मिळत नाही. अनेकांना डिलिव्हरी झाल्याचा मेसेज मोबाइलवर येतो, मात्र प्रत्यक्षात सिलिंडर घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
संतप्त झालेल्या नागरिकांनी गॅस एजन्सी चालकाला जाब विचारल्याने वादावादी झाली. यासंदर्भात यश-हिरा भारत गॅस एजन्सीचे चालक जितेंद्र पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
उपस्थित कर्मचाऱ्यांच्या 3 सांगण्यानुसार दोन ते तीन दिवस एजन्सी बंद असल्याने सिलिंडरची गाडी आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना सिलिंडर उपलब्ध झाला नाही. आता तीन गाड्या येणार असल्याने सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सिलिंडर सोमवारनंतर घरपोच देण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे.
Web Summary : Mumbai grapples with a severe gas cylinder shortage due to the Gulf war. Long queues and disputes erupted at agencies, requiring police intervention. Deliveries are delayed, and black market prices soar, causing widespread public frustration. Relief expected after Monday.
Web Summary : खाड़ी युद्ध के कारण मुंबई में गैस सिलेंडर की भारी कमी हो गई है। एजेंसियों पर लंबी कतारें और विवाद हो रहे हैं, जिसके लिए पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा। डिलीवरी में देरी और कालाबाजारी से जनता परेशान है। सोमवार के बाद राहत की उम्मीद है।