Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:22 IST2025-05-15T18:21:45+5:302025-05-15T18:22:52+5:30
BMC: मुंबई महानगरपालिकेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यावर भर दिला आहे.

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती जलचर आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यावर भर दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना विनामूल्य शाडूची माहिती देण्याची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर कमी करण्याचा मुंबई महानगरपालिकाचा उद्देश आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या पोस्टमध्ये मूर्तीकारांना विनामूल्य शाडूच्या माती देण्याची घोषणा केली. याशिवाय, मूर्तींसाठी तात्पुरते मंडप उभारण्यासाठी आणि शाडूच्या मातीसाठी इच्छुक मूर्तिकारांना https://portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना बृहन्मुंबई महानगरपालिका देतेय विनामूल्य शाडू माती,
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 15, 2025
चला साजरा करुया, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव !#mybmcupdate#EcoFriendly@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish@MPLodhapic.twitter.com/gpfYwk4vcv
प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठ्या प्रमाणात वापर
मुंबईत दरवर्षी १ लाख ८८ हजार गणेशमूर्ती विसर्जित होतात. मुंबईतील घरगुती गणेशमूर्तींची संख्या १ लाख ७३ हजारांच्या जवळपास आहे, त्यासाठी ८ लाख ६५ हजार किलो पोओपीचा वापर केला जातो. तर, घरगुती गौरी मूर्तींची संख्या ६ हजारांच्या आसपास आहे, ज्यासाठी ३० हजार किलो पीओपीचा वापर केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची संख्या ९ हजार ३०० इतकी आहे. या गणेशमूर्तींसाठी ३७ लाख २० हजार किलो पीओपी वापरला जातो. एकूणच मुंबईत गणेशमूर्तींची तयार करताना ४६ लाख १५ हजार किलो पीओपीचा वापर केल जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिस किती धोकादायक?
गणेशमूर्तीसाठी वापरला जाणारा पीओपी पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कारण, पीओपी पाण्यात विरघळत नाही, ज्यामुळे पाण्यात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि जलचर जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. पीओपीमुळे काही रासायनिक घटक पाण्यात मिसळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे गणेशमूर्तींसाठी शाडूच्या मातीचा वापर करणे अधिक योग्य आहे.