खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्यासाठी पुन्हा निविदेचा फेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:13 IST2025-05-29T13:12:58+5:302025-05-29T13:13:21+5:30

मुंबई महापालिका प्रशासनाकडून मनोरी येथील निक्षारीकरण प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू

Mumbai Municipal Administration starts process for desalination project in Manori | खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्यासाठी पुन्हा निविदेचा फेरा

खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्यासाठी पुन्हा निविदेचा फेरा

मुंबई : शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु, या प्रकल्पाच्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही प्रक्रियाच पालिकेने रद्द केली होती. मात्र, सरकारने पुन्हा नव्याने निविदा काढण्याची सूचना पालिकेला केली होती. त्यानुसार प्रशासनाने पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे. 

तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा, विहार आणि तुळशी तलावातून मुंबईला दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. पालिकेच्या अभ्यासानुसार २०४१ पर्यंत मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, प्रतिदिन सहा हजार ४२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. 

पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर पाणी 

पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

 या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात ४०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प आहे. 

एकाच कंपनीने भरला अर्ज 

पालिकेने या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२३ पासून निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, तांत्रिक मुद्दे आणि अटी-शर्तींमुळे प्रतिसाद न मिळाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात होती. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच त्यात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे निविदा रद्द करून पालिकेने पुन्हा १५ दिवसांची मुदत असलेली निविदा काढली. 

त्यावेळी केवळ एकाच कंपनीने अर्ज भरला. परिणामी निविदा भरण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर निविदा प्रक्रिया पालिकेने रद्द केली. दरम्यान, पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री गोयल यांनी या प्रकल्पाला पुन्हा गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

४ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट 

निक्षारीकरण प्रकल्पांतर्गत पाणी आणणे आणि सोडण्यासाठी समुद्रात दोन किलोमीटर लांबीचे दोन बोगदे बांधावे लागणार आहेत. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 
 

Web Title: Mumbai Municipal Administration starts process for desalination project in Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.