Mumbai: महामुंबईतील गृहखरेदीदारांची पहिली पसंती मुंबई शहरालाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:44 IST2026-02-06T14:43:47+5:302026-02-06T14:44:43+5:30
Mumbai News: नवी मुंबई, ठाण्याकडेही ग्राहकांचा वाढतोय ओढा

Mumbai: महामुंबईतील गृहखरेदीदारांची पहिली पसंती मुंबई शहरालाच!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: एकीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे महामुंबईमध्ये आजही मुंबई व उपनगरात घरखरेदीला ग्राहक पसंती देत असल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. २०२५ या वर्षामध्ये मुंबई शहरात १ लाख ५३ हजार मालमत्तांची विक्री झाली. यामध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे होते तर उर्वरित २० टक्के मालमत्ता या व्यावसायिक तसेच कार्यालयीन स्वरूपाच्या होत्या. या सर्वेक्षणानुसार, २०२५ प्रमाणेच २०२६ मध्ये देखील हाच ट्रेन्ड कायम राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानुसार, मुंबई व उपनगरात हा ट्रेन्ड कायम राहण्यामागची कारणमीमांसा नमूद केली आहे. मुंबईत विशेषतः मध्य व दक्षिण मुंबईत गेल्या वर्षीप्रमाणेच महागड्या घरांच्या विक्रीचे प्रमाण आहे तसेच दिसून येईल. मात्र, उपनगरांत घरांच्या विक्रीचा वेग अधिक वाढताना दिसेल. याचे कारण म्हणजे पश्चिम व पूर्व उपनगरात जी पायाभूत सुविधांची विकामकामे सुरू आहेत, त्यापैकी अनेक कामे यंदाच्या वर्षी पूर्ण करण्यावर विकासकांचा भर आहे.
मेट्रोचे जाळे, विमानतळामुळे घरखरेदी जोमात
मुंबईप्रमाणेच घरखरेदीसाठी लोकांच्या पसंतीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर, तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर पनवेल असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. तर नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असून येथे मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. येथे विविध कार्यालयांची संख्यादेखील वाढल्याने नागरिक घरखरेदीस पसंती देत आहेत. यापुढेही गृह खरेदीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नवनवीन प्रकल्पांना सुरुवात
अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ झाल्यामुळे पनवेल व परिसरात घर घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पनवेल परिसरात घरांच्या किमती आगामी काळात लक्षणीयरीत्या वाढू शकतात. याचा आडाखा बांधत अनेक विकासकांनी तेथे मोठमोठे प्रकल्प सुरू केले आहेत.
बजेटनुसार घरे उपलब्ध
आजच्या घडीला दोन्ही उपनगरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे तसेच जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे घरांची उपलब्धता वाढत आहे. परिणामी, लोकांना घरे खरेदी करण्यासाठी पर्याय उपलब्ध होत आहेत. त्यामुळे लोक आपल्या बजेटनुसार या परिसरात घरखरेदीस प्राधान्य देताना दिसतील.