लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई वगळता मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांश ठिकाणी सोमवारी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ठाण्याचे कमाल तापमान ४०, तर मुंबईचे ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. एमएमआरमधील उष्णतेची लाट मंगळवारी आणि बुधवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा पारा ३६ अंशाच्या आसपास घुटमळेल, असा अंदाज आहे.
फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला होता. त्यानंतर कमाल तापमान ३५ अंशांवर स्थिर होते. गेल्या आठवड्यात मळभ हटल्यानंतर थेट पडलेली सुर्यकिरणे, आर्द्रतेमधील चढउतार, समुद्री वारे स्थिर होण्यास होणारा विलंब अशा अनेक कारणांमुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत.
वायव्य दिशेकडून गरम वारे येत आहेत. गुजरातमध्ये उष्णतेची लाट आली आहे. हे उष्ण वारे मुंबईकडे वाहत आहेत. त्यांचा परिणाम म्हणून कमाल तापमानात वाढ झाली आहे. मंगळवार आणि बुधवारीही तापमान वाढलेलेच असेल. अथ्रेय शेटटी, हवामान अभ्यासक