मोठी बातमी! लोकलच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार; राजेश टोपेंचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:26 IST2021-02-02T12:24:24+5:302021-02-02T12:26:10+5:30

सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील

mumbai local timetable will change says rajesh tope | मोठी बातमी! लोकलच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार; राजेश टोपेंचं आश्वासन

मोठी बातमी! लोकलच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार; राजेश टोपेंचं आश्वासन

मुंबईतील चाकरमान्यांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी अखेर सुरू करण्यात आली. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्या आहेत. याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. 

"लोकांचं हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील", असं राजशे टोपे म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.  मुंबईची लोकल सेवा कालपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाली असली तरी पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ नंतरच सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ७ नंतर ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येत नाहीय. शासनाच्या या वेळापत्रकावर मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र

मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी लवकरच नागरिकांना दिलासा दिला जाईल अशी माहिती दिली आहे. "लोकलची व्यवस्था ही सर्वांसाठीच अतिशय महत्वाची आहे. लोकलच्या वेळात काही सुधारणा होण्यासारखी असेल तर नक्कीच आमच्या विभागाकडून आम्ही याचा पाठपुरावा करू. शेवटी लोकांचं हित हाच सर्वात महत्वाचा विषय आहे. जनतेची गरज आणि हित ओळखूनच सरकार निर्णय घेईल", असं राजेश टोपे म्हणाले. 

मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा

दरम्यान, १ फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडे झाले असले तरी रेल्वे स्थानकांच्या तिकीट घरांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या प्रवाशांना रांगा लावूनही वेळेत तिकीट मिळालं नाही त्या प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. एकतर प्रवास करायला वेळेची अट व  दुसरीकडे प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे पहिल्या दिवसाच्या लोकल प्रवासावर एकप्रकारे विरजण पडल्याचे पाहायला मिळालं. 

कधी प्रवास करता येईल…?
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही…?
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत रेल्वे प्रवास करता येणार नाही.  या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. 
 

Read in English

Web Title: mumbai local timetable will change says rajesh tope