मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सगळीकडे ‘फादर्स डे’ साजरा होत असताना, गोवंडी येथे शनिवारी अपघातात आपल्या दोन्ही मुलांना गमावलेले गुलाम अहमद खान (४१) यांनी ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?,’ असा प्रश्न विचारत टाहो फोडला. या अपघातात खान यांचा लहान भाऊ आणि मोठ्या भावाच्या मुलाचाही अपघाती मृत्यू झाला आहे. एका अपघाताने हसती खेळती तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले खान कुटुंबीय साकीनाका येथील मिल्लतनगर परिसरात एका दुमजली घरात राहतात. शनिवारी अपघातात गुलाम यांचे मोहम्मद हुसेन (१३) आणि अब्दुल गणी (११) ही दोन मुले आणि मोठ्या भावाचा मुलगा अबुबकर म्हणजेच मोहम्मद आयान गुलाम मुस्तफा खान (९) आणि लहान भाऊ नूर मोहम्मद गुलाम नबी खान (२९) यांचा मृत्यू झाला आहे.
गुलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी घरातील एका बकऱ्याचा मृत्यू झाला. बकऱ्यासोबत मुलांची गट्टी जमल्याने ते त्यांच्यासोबतच खेळायचे. या घटनेने मोठ्या भावाचा मुलगा अबुबकरला धक्का बसला. त्यानेही नवीन बकऱ्यासाठी हट्ट करत घर डोक्यावर घेतले. त्याची अवस्था बघून मोठ्या भावाने मुलासाठी नवीन बकरा आणण्यासाठी लहान भाऊ नूरला जाण्यास सांगितले. नवीन बकरा येणार म्हणून अबुबकर आनंदात होता. तो नूरसोबत निघाला. त्याच्या पाठोपाठ माझ्याही दोन मुलांनी सोबत जाण्यासाठी हट्ट धरला. नूर या तिन्ही मुलांना घेऊन दुचाकीने बकरा आणण्यासाठी देवनारच्या दिशेने निघाला. मात्र घाटकोपर लिंक रोड लोटस जंक्शनवर मृत्यूने त्यांना गाठले. भरधाव वाहनाच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे गुलाम यांनी सांगितले.
...अन् अश्रूंचा बांध फुटलागुलाम म्हणाले, आम्ही सहा भावंडे. त्यापैकी चार भावांची लग्न झाली. दुमजली घरात सगळे एकत्र राहतो. मोठा मुलगा हुसेन हा नववी, तर अब्दुल सहावीत जाणार होता. सोमवारपासून शाळा सुरू होणार म्हणून हौसेने मुलांची शाळेची तयारी केली होती. ‘अब बच्चे ही नही रहे. मुझे अब पापा कौन कहेंगे?’, असे म्हणत गुलाम यांच्या अश्रूंचा बांध फुटला.