BMC: मुंबईत स्वच्छतेचे नवे नियम लागू; अस्वच्छता करणाऱ्यांवर पालिकेची कडक नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:17 IST2026-02-06T14:14:33+5:302026-02-06T14:17:28+5:30
Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचं स्वच्छ शहर बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आता क्लीन-अप मार्शल नाही, तर पालिकेचे अधिकृत ३०० हून अधिक ज्युनिअर सुपरवायझर्स थेट मैदानात उतरून दंड वसूल करणार आहेत.

BMC: मुंबईत स्वच्छतेचे नवे नियम लागू; अस्वच्छता करणाऱ्यांवर पालिकेची कडक नजर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शहर आणि उपनगरांत अस्वच्छता करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र, क्लीन अप मार्शल हटविल्याने दंडवसुलीसाठी पालिका ३०० हून अधिक ज्युनिअर सुपरवायझर्सची नियुक्ती करणार आहे. दंड वसुलीकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, दंडाची पावती आणि व्यवस्थापनासाठी टॅबही दिले जाणार आहेत.
मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी पालिकेने स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी २०२५ लागू केला आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. विनापरवाना राडारोडा वाहतूक करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा मोठा दंड ठोठवला जाणार आहे.
११ पासून दंड आकारणी
यापूर्वी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी पालिकेने क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र, त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांची सेवा स्थगित करण्यात आली. त्यामुळे पालिका आता ही जबाबदारी २५ विभागीय कार्यालय क्षेत्रातील ज्युनिअर सुपरवायझर्सवर सोपविणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. ११ फेब्रुवारीपासून स्वच्छताविषयक नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.