Join us  

मुंबईची बससेवा ठरणार पर्यावरणासाठी ‘बेस्ट’, २५० बेस्ट गाड्यांमध्ये वायू शुद्धीकरण यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 3:35 PM

बेस्टकडून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : बेस्टकडूनमुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ३०० बेस्ट बसेसवर एअर प्युरिफायर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांपैकी बेस्टच्या २४० बसगाड्यांवर ‘वायू शुद्धीकरण यंत्रणा’ बसविण्यात आल्यात. १५ दिवसांत उर्वरित ६० बसगाड्यांवरही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

बेस्ट उपक्रमाच्या ‘वायू शुद्धीकरण यंत्रणा’ बसविलेल्या बसगाड्यांचा अनावरण सोहळा मंगळवारी पार पडला. त्यावेळी केसरकर बोलत होते.  मोटार वाहनांतर्फे वायू प्रदूषण निर्माण होते, त्याच ठिकाणी वायू शुद्धीकरण यंत्रणेद्वारे प्रदूषित वायूचे शुद्धीकरण करण्यात येते. 

लवकरच आणखी इलेक्ट्रिक बसेस -

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच आणखी २५० एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुविधेसाठी २०२७ पर्यंत गाड्यांचा ताफा १० हजारांवर नेण्यात येणार आहे. 

दरम्यान, आता हरियाणा स्थित पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीकडून १२ मीटर लांबीच्या २५० बसगाड्या घेण्यात येणार आहेत. या बसगाड्या येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. ही कंपनी एकूण २४०० बसगाड्यांचा पुरवठा करणार आहे.

टॅग्स :मुंबईबेस्टवायू प्रदूषणदीपक केसरकर