Mumbai Local: रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून लोकलनं अवैध पद्धतीनं प्रवास करताय? मग थांबा! 'ही' माहिती वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:19 IST2021-05-26T17:17:47+5:302021-05-26T17:19:38+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत लोकल प्रवासासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी आहे. तरीही काही सामान्य प्रवासी देखील नियमांचा भंग करुन लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Local: रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून लोकलनं अवैध पद्धतीनं प्रवास करताय? मग थांबा! 'ही' माहिती वाचा...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत लोकल प्रवासासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी आहे. तरीही काही सामान्य प्रवासी देखील नियमांचा भंग करुन लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. यात अनेक प्रवासी विनातिकीट किंवा खोटं ओळखपत्र तयार करुन प्रवास करत आहेत.
मुंबईच्या मध्य रेल्वे विभागानं गेल्या ६० दिवसांमध्ये असा अनिधिकृत प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार लोकांवर कारवाई केली आहे. यात रेल्वेला दंडाच्या स्वरुपात कोट्यवधी रुपयांची मिळकत देखील प्राप्त झाली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत अवैध पद्धतीनं प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार ७९३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यात रेल्वेनं एकूण ३ कोटी ९७ लाख रुपये दंडात्मक स्वरुपात वसुल केले आहेत. १४ एप्रिलपासूनच लोकलमधून सामान्य नागरिकांच्या प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांशी निगडीत असलेल्या कर्मचारी वर्गालाच लोकल सेवेचा वापर करण्यास परवागनी आहे.
याशिवाय, रेल्वेनं १७ एप्रिल ते २१ मे या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या १ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई केली आहे. रेल्वेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत रेल्वे प्रशासनानं खोटी ओळखपत्र तयार करुन प्रवास करत असलेल्या ८०८ प्रवाशांवर कारवाई केली आहे. अशा प्रवाशांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड देखील वसुल करण्यात आला आहे. यात बहुतेक जण महानगरपालिकेचं खोटं ओळखपत्र तयार करुन प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे.