Join us

अकरावीसाठी कोट्यांतर्गत लाखांहून अधिक अर्ज, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 05:18 IST

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीसंदर्भातील विविध कोट्याअंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने ११ जून रोजी उशिरा मध्यरात्री जाहीर केली. या यादीबाबत विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

मुंबई - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीसंदर्भातील विविध कोट्याअंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने ११ जून रोजी उशिरा मध्यरात्री जाहीर केली. या यादीबाबत विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १२ जून रोजी सायंकाळपर्यंत राज्यभरातून एकूण १ लाख १३ हजार ४८ अर्ज दाखल झाले असून त्यातील केवळ ९०८७ (८ टक्के) विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला.

अल्पसंख्यांक, इन-हाऊस आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत अकरावी प्रवेशासाठी १२ ते १४ जून या कालावधीत प्रवेशाची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने अधिकृत सूचना पत्रही जारी केले आहे. मात्र शिक्षण विभागाने ११ जूनला मध्यरात्री गुणवत्ता यादी जाहीर केल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. ही यादी जाहीर करण्यात गोंधळ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

शिक्षण विभागाचा गोंधळ लवकर संपायला हवा. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश होतील, अशी तयारी शिक्षण विभागाने करायला हवी. - सुदाम कुंभार, ज्येष्ठ समुपदेशक 

यंदा अकरावीसाठी राज्यातील ९४३५ महाविद्यालयांमध्ये एकूण २१,२३,४० जागा उपलब्ध आहे. त्यापैकी केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप फेरी) अंतर्गत १८,९७,५२६ जागा निश्चित केल्या आहेत, तर विविध कोट्यांसाठी २,२५,५१४ जागा राखीव आहेत.

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालय