लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मनसेच्या केंद्रीय समितीने उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष यांची मते जाणून घ्यावीत. त्यांच्याकडील माहितीचा, अनुभवांचा समावेश असणारा अंतिम मसुदा अहवाल तयार करण्याचे आदेश अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. अंतिम मसुद्यानंतर पक्षातील रिक्त पदांवर नवे पदाधिकारी नेमणे, काहींना वरिष्ठ पदावर बढती, तर निष्किय पदाधिकाऱ्यांची पदावनती करण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील, अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर केंद्रीय समितीचे निरीक्षक, विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बैठक पार पडली. यावेळी नेते अमित राज ठाकरे, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, प्रवक्ते अविनाश जाधव, यशवंत किल्लेदार, संजय जामदार, बंटी म्हशीलकर आदी नेते उपस्थित होते.आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पदनिहाय केंद्रीय समित्या नेमल्या होत्या. समितीमधील निरीक्षकांनी विभाग अध्यक्ष ते गटाध्यक्ष यांची मते जाणून अहवाल तयार केला. मात्र, केंद्रीय व विभाग समितीचे सदस्य वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही समित्यांच्या सदस्यांनी एकत्र चर्चा करावी.
शनिवारी गटाध्यक्ष तर १२ तारखेला शाखाध्यक्ष व उपशाखाध्यक्ष यांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्याबाबतचा अहवाल व त्यावरील शिफारशींचा अंतिम मसुदा तयार करून तो शसादर करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्या, असे सूत्रांनी सांगितले.