Join us

Raj Thackeray: 'शाखा आहे, दुकान नाही'; राज ठाकरे राज्यभर पाठवणार शिवरायांचा मोलाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 08:23 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या एका कार्यालयाच्या उदघटन कार्यक्रमात उपस्थिती लावली असता त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना महत्वाची घोषणा केली आहे.

मुंबई- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या एका कार्यालयाच्या उदघटन कार्यक्रमात उपस्थिती लावली असता त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना महत्वाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्याकडून राज्यातील मनसेच्या सर्व शाखा, कार्यालयं तसंच शासकीय कार्यालयांना देखील एक भेटवस्तू पाठवली जाणार आहे. ही भेटवस्तू म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या संदेशाच्या दोन ओळी असणार आहेत आण या दोन ओळींची पाटी प्रत्येक कार्यालयात लावली जावी असं राज ठाकरे यांनी सूचना सर्व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील कांदिवली येथे पक्ष कार्यालयाचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. उपस्थित कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधित केलं. "आपल्या शाखेच्या उदघाटनाला म्हणून मी आलो. मी भाषण करायला व्यासपीठावर आलो नाही. कारमधून जाताना तुमचं दर्शन होत नाही. त्यामुळे केवळ तुमर्च दर्शन घेण्यासाठी व्यासपीठावर आलो. खरंतर येताना मला एक गोष्ट सोबत घेऊन यायची होती. पण यायला उशीर झाल्यानं ते शक्य झालं नाही. पण लवकरच राज्यातील सर्व मनसे शाखा, कार्यालयं आणि शासकीय कार्यालयांनाही मी एक भेट वस्तू पाठवणार आहे. ती भेटवस्तू म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रामधील दोन ओळी असणार आहेत. प्रत्येक शाखा आणि कार्यालयाच्या भिंतीवर या दोन ओळींची पाटील लागली गेली पाहिजे", असं राज ठाकरे म्हणाले. 

या आहेत त्या दोन ओळी..."कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे", या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रातील दोन ओळी प्रत्येक कार्यालयाच्या भींतीवर असल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. "प्रत्येक शाखेच्या भींतीवर शिवरायांच्या या दोन ओळी लागल्या गेल्या पाहिजेत. कारण ती शाखा आहे दुकान नव्हे. तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. कसं वागावं याचं जे शिवरायांनी अनेक संदेशातून सांगितलं आहे. त्यातील या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत. माझ्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना लोकांना त्रास देऊ शाखा चालवायच्या नाहीत", असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसे