Join us  

तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 5:49 PM

Raj Thackeray: पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केली आहे.

बई- पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणेने पीएफआयच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे देखील आक्रमक झाले आहेत. 

"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशारा

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली...थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करु, घोषणा देणार जिकडे असतील, तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. 

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र सरकारपुणेकेंद्र सरकार