पाच विमानतळांचा ताबा लवकरच ‘एमआयडीसी’कडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 09:07 IST2023-09-28T09:06:34+5:302023-09-28T09:07:10+5:30
नांदेड, लातूर, यवतमाळचा समावेश

पाच विमानतळांचा ताबा लवकरच ‘एमआयडीसी’कडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या पाच विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या १४ वर्षांत येथे विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे या विमानतळांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) घेणार आहे. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.
एमआयडीसीने विकसित केलेल्या विमानतळांबाबत बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एमआयडीसीने नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीने आणि विमानतळांच्या सक्षमीकरणासह हवाई सेवा सुरू करण्यासाठी या पाच विमानतळांचे हस्तांतरण खासगी कंपनीकडे करण्यास वर्ष २००९ मध्ये परवानगी देण्यात आली होती. परंतु, आज त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे ही पाचही विमानतळे एमआयडीसीने आपल्या ताब्यात घ्यावीत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
‘लोकमत’चा पाठपुरावा
या पाचही विमानतळांसंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा घेतला आहे. त्यानंतर
सरकारने आता कार्यवाही सुरू केली आहे.