म्हाडाचा दरमहा ३० हजार भाडे देण्याचा प्रस्ताव; बीडीडीवासीयांची ३५ हजार देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:16 IST2026-01-22T14:16:08+5:302026-01-22T14:16:41+5:30
२५ हजारांत भाडेतत्वावर घर मिळणे झाले अवघड

म्हाडाचा दरमहा ३० हजार भाडे देण्याचा प्रस्ताव; बीडीडीवासीयांची ३५ हजार देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना देण्यात येणारे प्रतिमहिना २५ हजार रुपये भाडे वाढवून ३० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, सध्याची महागाई आणि घरांचे वाढणारे भाडे विचारात घेऊन म्हाडाने ३० हजार रुपयांऐवजी ३५ हजार रुपये देण्याचा विचार करावा, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
म्हाडाच्या वतीने वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. जुन्या चाळी पाडून येथे नव्या इमारती बांधल्या जात आहेत. या कामादरम्यान चाळीतील रहिवाशांना लगतच्या संक्रमण शिबिरांत घरे दिली जात आहेत. मात्र, आता संक्रमण शिबिरेही उरलेली नाहीत. रहिवाशांना भाड्याचा पर्यायही खुला असला तरी म्हाडाकडून भाड्यात वाढ झालेली नाही. मध्य मुंबई परिसरात २५ हजारांत भाड्याने घर मिळणे रहिवाशांना कठीण झाले आहे.
मध्य मुंबईत भाड्याने घर मिळणे कठीण झाले आहे. आणि ते मिळाले तरी महिन्याचे भाडे ३५ हजारांच्या आसपास आहे. आता भाडे ३० हजार होत असेल तर आनंदच आहे. मात्र, भाड्याच्या रकमेत आणखी वाढ केली तर महागाईच्या जमान्यात रहिवाशांना दिलासा मिळेल.
-कृष्णकांत नलगे, अध्यक्ष, ना.म.जोशी मार्ग बी.डी.डी. पुनर्विकास समिती
प्रस्ताव सरकार दरबारी
रहिवाशांना ३० ते ३५ हजार भाड्यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे भाड्याच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात होती. त्यामुळे म्हाडाने भाडे वाढवून मिळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.