Join us  

‘अत्याधुनिक यंत्रणेसह मेट्रो वन होणार डिजिटल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 12:26 PM

मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या आणि मुंबईतील पहिली मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो वनला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली.

योगेश जंगम 

मुंबई - मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या आणि मुंबईतील पहिली मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो वनला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. आता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून मेट्रो वनचा सर्व व्यवहार डिजिटल करण्याकडे भर देण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (वाहतूक)चे अध्यक्ष अभयकुमार मिश्रा यांच्याशी केलेली बातचित.

प्रश्न - मेट्रो वनची सेवा आणखी चांगली करण्यासाठी कशाला प्राधान्य देण्यात येईल?

उत्तर - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संचलित मुंबई मेट्रो वन गेली पाच वर्षे मुंबईकरांच्या सेवेत आहे. भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पातील हा पहिला खासगी सार्वजनिक प्रकल्प आहे. आतापर्यंत मुंबई मेट्रो वनच्या ६.१७ लाख फेऱ्या झाल्या असून त्याअंतर्गत ५ कोटी ४० लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. येत्या काळात आम्ही आणखी कॅशलेस, डिजिटल प्रयोग करून पाहणार आहोत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर देण्यात येईल. जेणेकरून प्रवाशांचा वेळ आणि कर्मचाऱ्यांचे श्रम वाचतील.

प्रश्न - प्रवासी वाढविण्यासाठी काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत का?

उत्तर - कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास अधिकाºयांशी, प्रशासकीय प्रमुखांशी मुंबई मेट्रो वनची टीम सतत संपर्कात असते. नोकरदारांच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यासाठी, त्यांच्याशी नाते निर्माण करण्यासाठी, जास्तीतजास्त चांगली सेवा पुरविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे प्रवासी आपोआपच मेट्रो वनने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. आतापर्यंत आम्ही ४५० कॉर्पोरेट कंपन्यांच्या संपर्कात आहोत. त्यातील ३ कंपन्यांचे २०० हून अधिक कर्मचारी आमच्याकडून पास घेतात.

प्रश्न - मेट्रोमध्ये खाण्या-पिण्यावर प्रतिबंध घालण्याचे कारण काय?

उत्तर - मेट्रोमध्ये खाण्याचे पदार्थ किंवा पेय नेल्याने अन्य प्रवाशांना अडचण किंवा त्रास होतो. त्यामुळे मेट्रो कायद्यानुसार मेट्रोत खाद्यपदार्थ खाल्ल्यास तो गुन्हा ठरतो. असा गुन्हा केल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रवाशाला ५०० रुपये दंड आकारला जातो. शिवाय खाद्यपदार्थ खाऊन रॅप तिथेच टाकणे, मेट्रो खराब करणे असे प्रकारही घडू शकतात. हे टाळून आमचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये स्वच्छतेची सवय अंगवळणी पडावी, हेच आमचे ध्येय आहे.

लिंक बेस्ड यंत्रणा म्हणजे काय?

आम्ही आमच्या मोबाइल तिकीट यंत्रणेला स्कीप क्यू म्हणतो. ज्यात प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. तर ते मोबाइलवरील क्यूआर कोडद्वारे तिकीट काढू शकतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी आम्ही लिंक बेस्ड यंत्रणा मेट्रो स्टेशन्सवर विकसित केली आहे. या यंत्रणेत पॉस मशिनची गरज नाही. पेमेंटसाठी प्रवाशांना त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अन्य कोणाच्याही हातात द्यावे लागत नाही. प्रवाशांना डिजिटल पेमेंट चांगल्या प्रकारे करता यावे यासाठीच आता आणखी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करणे, प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.

...म्हणूनच मेट्रोचे वेळापत्रक पाळणे शक्य

उत्तर - वेळापत्रक कोलमडू नये यासाठी आम्ही सतर्क असतो. त्यासाठी देखभाल करणाºया कर्मचाºयांची प्रत्यक्ष रेल्वे लाइनवर नियुक्त असते. जेणेकरून ट्रेनमध्ये बिघाड झाला तर तो पटकन दूर होईल. मेट्रोचे वेळापत्रक बिघडणार नाही. तसेच प्लॅटफॉर्मवरही समस्या उद्भवू नये यासाठी कर्मचारी तैनात असतात. ते नियोजनबद्ध काम करीत असल्यामुळेच वेळापत्रक रुळावरून घसरत नाही.

स्वच्छता सर्वांत महत्त्वाची; त्यामुळेच मेट्रोमध्ये खाद्यपदार्थ खाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. 

- अभयकुमार मिश्रा

 

टॅग्स :मुंबईमेट्रो