माथाडींचा एल्गार
By Admin | Updated: May 21, 2014 05:06 IST2014-05-21T05:06:54+5:302014-05-21T05:06:54+5:30
निवडणुका संपताच माथाडी कामगारांमधील शासनाविरोधातील असंतोष उफाळून आला आहे

माथाडींचा एल्गार
नवी मुंबई : निवडणुका संपताच माथाडी कामगारांमधील शासनाविरोधातील असंतोष उफाळून आला आहे. घरांसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी २८ मे रोजी लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर पावसाळी अधिवेशनाच्यावेळी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेल, डाळी, गूळ, मैदा व साखर या वस्तू बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील हजारो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई बाजार समितीच्या मसाला व धान्य मार्केटमधील अनेक कामगारांच्या वेतनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. भाजीपाला व फळेही वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाले तर माथाडींचा गिरणी कामगार होण्यास वेळ लागणार नाही. याशिवाय कामगारांच्या कोपरखैरणे, घणसोली व वडाळ्यामधील घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शेकडो कामगारांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागले आहे. इतरही अनेक प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नाहीत. निवडणुकीमुळे शांत असलेल्या माथाडींनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १९ मे रोजी माथाडी भवनमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार नरेंद्र पाटील यांनी आंदोलनाविषयी दिशा स्पष्ट केली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी २८ मे रोजी लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार आहे. या बंदनंतरही शासनाने प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळी अधिवेशनात हजारो कामगार विधानभवनावर मोर्चा घेवून जाणार आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलनाची तयारी करण्यासाठी २३ मे रोजी पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी प्रश्न सुटल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)