मुंबई: मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुमारे १७ वर्षांनी विशेष एनआयए न्यायालय आज, गुरुवारी (दि. ३१) देणार आहे. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे सात जण यातील आरोपी आहेत.
या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १००हून अधिक जखमी झाले होते.या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आरोपींना योग्य शिक्षा देण्याची मागणी ‘एनआयए’ने विशेष न्यायालयाकडे केली आहे. सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यांपैकी ३७ साक्षीदार फितूर झाल्याचे जाहीर करण्यात आले.
अशी घडली होती घटना
हा खटला २०१८ मध्ये सुरू झाला आणि १९ एप्रिल २०२५ रोजी त्याचे कामकाज पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. देशातील प्रदीर्घ काळ चाललेल्या दहशतवादाबाबतच्या खटल्यांपैकी हा एक आहे. या बॉम्बस्फोटाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएस करत होते. त्यानंतर २०११ मध्ये हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी, राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा कट रचण्यात आला होता, असे अंतिम युक्तिवादात ‘एनआयए’ने म्हटले होते.