Join us  

महावीरनगर स्थानक खाडीवरून रोपवेने जोडणार; पाचशे कोटी रुपये खर्च येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:01 AM

प्रवाशांचा मार्ग होणार सुखकर

मुंबई : दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर या मेट्रो-२ ए मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट गोराईला जाता येणार आहे. मेट्रो-२ ए या मेट्रो मार्गिकेवरील महावीर नगर मेट्रो स्थानक येथून गोराईकडे जाण्यासाठी खाडीवरून रोपवे सुरू करण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आहे. या रोपवेच्या मार्गावर दररोज चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतील,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एमएमआरडीएने यापुर्वी चारकोप ते मार्वे गाव असा ३.६ किमीचा रोपवे सुरू करण्याची योजना बनवली होती, मात्र काही कारणास्तव ही योजना बारगळली. महावीर नगर स्थानक ते गोराई या रोपवेसाठी पाचशे कोटी रूपये खर्च येणार आहे. या रोपवे मार्गावर आठ स्थानके असणार आहेत. ही ठिकाणे अद्याप निश्चित व्हायची आहेत. रोपवेच्या कामासाठी महिन्याअखेरीस निविदा काढण्यात येणार आहेत. हा रोपवे तयार झाल्यावर चारकोप कांदिवलीतील नागरिकांचा प्रवासही सोईचा ठरणार आहे.

लिंकरोडवरील वाहतूक कोंडीमध्ये न अडकता सरळ या रोपवेने चारकोपवरून कांदिवलीला कमी वेळेमध्ये पोहचता येणार आहे. सध्या गोराई आणि मनोरी गावातील रहिवासी बोरिवलीला जाण्यासाठी फेरीबोटीचा वापर करतात. रोपवेच्या अंमलबजावणीसाठीचे अधिकार सरकारने एमएमआरडीएला दिले आहेत. मेट्रो-२ अ मार्गिकेचे जलद गतीने काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत मेट्रो-२ ए मार्गिका सुरू होणार आहे. या मार्गिकेला रोपवे जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना सलग दहिसरवरून अथवा डी.एन.नगर येथून गोराईला जाता पोहचणे सोपे होणार आहे.आराखडा तयार करण्यासाठी कंपनीची नेमणूक होणारगोराई ते मेट्रो-२ ए मार्गिकेवरील महावीरनगर स्थानकापर्यंत खाडीवरून रोपवेने जोडण्यासाठी एमएमआरडीए आरारखडा तयार करण्यासाठी कंपनीची नेमणूक करणार आहे. नेमण्यात आलेली कंपनी सर्वेक्षण करून आराखडा तयार करून एमआरडीएकडे हा आराखडा सादर करणार आहे. यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने शिवडी ते एलिफंटा असा रोप-वे टाकला जाणार आहे. त्यामुळे महावीर नगर स्थानक ते गोराई हा मुंबईतील दुसरा रोप-वे ठरणार आहे.

टॅग्स :एमएमआरडीएमेट्रो