त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 07:34 IST2024-12-05T07:33:50+5:302024-12-05T07:34:38+5:30
जनादेशाचा सन्मान करणारा कारभार करू : फडणवीस

त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भाषण देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मिळालेल्या जनादेशाचा सन्मान होईल असा कारभार करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, आपल्याला पदांसाठी नाही तर राज्याच्या व्यापक हितासाठी काम करायचे आहे असा सल्ला त्यांनी पक्षाच्या आमदारांना दिला. फडणवीस यांनी सूचित केलेला हा त्याग नेमका कोणाकोणासाठी असेल याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जनतेच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. एकदिलाने आणि मित्रपक्षांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. मनातील सगळ्याच अपेक्षा अशावेळी पूर्ण होतात असे नाही. चार गोष्टी कधी मनासारख्या होतील, तर कधी चार गोष्टी मनाविरुद्ध होतील हे लक्षात ठेवावे, आपल्याला पदांसाठी नाही तर राज्याच्या व्यापक हितासाठी काम करायचे आहे असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र अव्वल स्थानी नेण्याचे लक्ष्य
फडणवीस म्हणाले की, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, दलित, ओबीसी, वंचित समाज घटकांनी आपल्याला भरभरून मते दिली आहेत, त्या लोकभावनेचा सन्मान करावा लागेल. महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर राहील हे लक्ष्य ठेवावे लागेल. केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन, विजय रूपानी यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. तर फडणवीस हे महाराष्ट्राची चौफेर प्रगती करतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
‘फडणवीस आगे बढो’
मुंबई : विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी भाजपच्या आमदारांची बैठक बुधवारी विधानभवनात होत असताना अभूतपूर्व उत्साह बघायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ‘देवेंद्रजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो देवेंद्र फडणवीस जैसा हो’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढत असलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये अधिकच उत्साह होता. हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेल्या वसईच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांचे अनेक जण कौतुक करत होते. सावनेरमधून सुनील केदारांना हरवून आलेले आशिष देशमुख आकर्षणाचे केंद्र होते. संघ मुख्यालय असलेल्या मध्य नागपुरातून जिंकलेले प्रवीण दटके यांचेही सगळे अभिनंदन करत होते. अनेक आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत प्रवेश केला.
फडणवीस हेच नेते व्हावेत असे बाइट टीव्ही चॅनेल्सना अनेक आमदार देत होते.
‘सगळ्यांनी संघर्ष केला म्हणून हे यश’
फडणवीस यांनी काही कटू आठवणींचाही उल्लेख केला, पण विपरीत परिस्थितीतही पक्षाचे एकही आमदार आम्हाला सोडून गेले नाहीत असे ते म्हणाले.
२०१९ मध्ये मतदारांचा कौल आपल्यालाच मिळालेला होता, पण दुर्दैवाने तो हिसकावून घेण्यात आला.
जनतेशी बेईमानी करण्यात आली. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्यात आला, पण त्याही परिस्थितीत एकही आमदार आपल्याला सोडून इतर पक्षात गेले नाहीत.
सगळ्यांनी संघर्ष केला आणि आज आपल्याला अभूतपूर्व यश मिळाले. आज तुम्ही आहात म्हणून मी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मित्रपक्षांचे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.