Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मोठा पराभव झाला, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत ४१ जागांवर विजय मिळवला. या आता पुन्हा एकदा राज्यातील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा सतीश चव्हाण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली. सुनिल तटकरे म्हणाले, सतीश चव्हाण यांनी १० ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले होते. आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे. सतीश चव्हाण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करुन पक्षाचे काम प्रमाणिकपणे करण्याचे सक्षम सांगितले, यामुळे आता त्यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.