Maharashtra Politics :'महापालिका निवडणूका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार'; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:48 IST2025-01-22T18:39:44+5:302025-01-22T18:48:31+5:30
Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे.

Maharashtra Politics :'महापालिका निवडणूका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार'; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
Maharashtra Politics ( Marathi News ) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अपात्र महिलांच्या खात्यातून पुन्हा पैसे परत घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही असाच एक दावा केला आहे. 'राज्यातील महापालिका निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची यादी वाढू शकते असा दावा ठाकरेंनी केला'. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील महापालिका निवडणूका झाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अपात्रतेची यादी महापालिका निवडणूका झाल्यानंतर वाढवतील आणि नंतर पुढे ही योजना बंद करतील, असा मोठा दावा ठाकरे यांनी केला.
दरम्यान, आता यावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. आम्ही कोणाकडून ही पैसे माघारी घेत नाहीत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महिलांकडून आम्ही योजनेत पात्र नसल्याने पैसे परत देण्याबाबत अर्ज देत आहेत. लग्न करुन परदेशी जाणे, चार चाकी वाहन, सरकारी नोकरी लागणे अशा गोष्टी घडल्या आहेत, असंही तटकरे म्हणाल्या.
तटकरे म्हणाल्या, लाडक्या बहीणींचा लाभ आम्ही माघारी घेतला नाही. महिला स्वत: हून पैसे देत आहेत. जानेवारीचा हप्ता हा २६ जानेवारी पर्यंत दिला जाणार आहे. जो संभ्रम निर्माण झालाय त्याला बळी पडू नका, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. लाडकी बहीण ही एकमेव योजना नाही की त्यांची स्कृटीनी होत असते, सगळ्या योजनांमध्ये ही प्रक्रिया असते. या योजनेचा हे पहिले वर्ष आहे. स्वतः महिला लाभ माघारी देत आहेत, यात प्रमाण हे रोज ५ ते १० आहेत. साधारण एकूण ३.५० ते ४.५० हजार एवढे अर्ज आले असावेत, असंही तटकरे म्हणाल्या.