Join us  

Maharashtra Lockdown : गड्या आपुला गाव बरा; स्थलांतरितांची रेल्वे स्थानकांवर पुन्हा माेठ्या प्रमाणावर गर्दी, कडक निर्बंधांमुळे परतीच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 6:52 AM

Maharashtra Lockdown : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे.

मुंबई : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू झाले आहेत. त्याआधीच हे निर्बंध लागू हाेतील, या भीतीने हातावर पोट असणारे स्थलांतरित मजूर, कामगार गावी परतू लागले हाेते. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून लागू झालेल्या कडक निर्बंधांनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लाेकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कुर्ला टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेंट्रलसारख्या जंक्शनवर स्थलांतरित मजुरांची गावी जाण्यासाठी पुन्हा माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. मात्र, केवळ आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेने प्रवास करता येत असल्याने तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. मात्र, बाहेरगावी विशेषत: उत्तर भारतात जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अधिक आहे. दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवलीच्या तुलनेत कुर्ला टर्मिनसवर बाहेर जाण्यासाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण जास्त आहे.

कारण सायन, कुर्ला, धारावीसह पूर्व उपनगरातील बहुतांश परिसरात मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर राहतात. येथील चेंबूर, मानखुर्द, कुर्ला, सायन आणि धारावीसारख्या परिसरात मोठे उद्योगधंदे आहेत. काेराेना संकटामुळे यातील बहुतांश आता बंद आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी कामगारांच्या हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही. त्यामुळे स्थलांतरित मिळेल त्या मार्गे आपल्या गावी जात आहेत. त्यामुळेच कुर्ला टर्मिनस येथे गावी जाण्यासाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवडाभरापासूनच त्यांनी परत जाण्यास सुरुवात केली असून, बुधवार आणि गुरुवारी यात आणखी भर पडली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर गावी जाण्यासाठी रांगा- आपल्या गावी परत जाण्यासाठी गुरुवारी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर हजारो परप्रांतीय मजुरांनी रांगा लावल्या होत्या. हे मजूर शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे असले तरी गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.- मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठीच सुरू आहे. त्यामुळे या मजुरांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आलेल्या रिक्षा, टॅक्सी यांचीही रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी झाली होती. - गर्दीवरील नियंत्रणासाठी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रोजगार गेला; चिंता उदरनिर्वाहाची!कामाठीपुरा, रे रोड, शिवडी, भायखळा, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विद्याविहार, सायन, धारावी, माहीम, अंधेरी, साकिनाका, घाटकोपर, बोरिवली, जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार, मजूर राहतात. यातील बहुतांश नाका कामगार, रोजंदारीवर काम करणारे आहेत. कडक निर्बंधांमुळे रोजगार गेला. रोजंदारी बुडाल्याने त्यांना उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे या मजुरांनी सांगितले.

विशेष अतिरिक्त गाड्यांची साेयप्रवाशांच्या साेयीसाठी मुंबई आणि दानापूर तसेच पुणे आणि भागलपूरदरम्यान विशेष अतिरिक्त गाड्या चालविल्या जात आहेत. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येत आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड - १९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस