मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली. अत्यंत पारदर्शक आणि खऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणारी ही योजना असेल, असे ठासून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची निश्चित आकडेवारी यंत्रणांकडे उपलब्ध नव्हती. यावरून सरकारला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागातून ऑनलाइनची अपेक्षा करणे हा द्रविडी प्राणायाम ठरला. तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटची मुदत १४ एप्रिल होती, ती वाढवून आता १ मे करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 07:23 IST